
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथे राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिनानिमित्त “अक्षय ऊर्जा जनजागृती अभियान” आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे आयोजन सोलारस्क्वेअर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या अभियानाचा मुख्य उद्देश विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सौर ऊर्जा, अक्षय ऊर्जा, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांविषयी जनजागृती निर्माण करणे हा होता. यावेळी सौर ऊर्जेच्या वापराबाबत माहिती, आधुनिक सौर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक तसेच विविध ज्ञानवर्धक व संवादात्मक उपक्रम आणि मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सोलारस्क्वेअर एनर्जी प्रा. लि. चे विक्री संचालक, सोनू कुमार यांनी उपस्थितांना अपारंपारिक ऊर्जेचे महत्त्व, सौरऊर्जेचा वापर, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी सोलारस्क्वेअर एनर्जी प्रा. लि. चे रुग्वेद ऐनापुरे, ओमदीप मलाकार, सुशांत काळे आणि सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून, भविष्यातील ऊर्जा संवर्धनासाठी सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी नमूद केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी आयोजकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या अक्षय ऊर्जा जनजागृती अभियानाचे नियोजन डॉ. शिल्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. अनिकेत गरुड, प्रा. डॉ. सोनाली महापरळे, प्रा. डॉ भाग्यश्री वरुडे, कल्याणी सहारे यांनी केले तर सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी दीक्षा पांडे हिने केले.

















