
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महापौर रवि लांडगे यांनी आज दिवसभर विविध पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या तसेच कोणत्याही नागरिकाला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
महापौरांनी सर्वप्रथम चिखली प्राधिकरण परिसरातील घरकुल येथे भेट देऊन पाण्यात उतरून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, नागरिकांच्या भावना जाणून घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांसह लवकरच संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी आणि परिणामकारक तोडगा काढण्यासाठी कडक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, सचिन सानप, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर महापौरांनी चिखली येथील महानगरपालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेतली. प्रत्येक कुटुंबाची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळेतील निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, औषधोपचार तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत का, याची त्यांनी स्वतः पाहणी केली. नागरिकांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नगरसेवक सोनम मोरे, विकास साने, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी महापौर म्हणाले, “आपत्तीच्या काळात प्रशासन ही केवळ यंत्रणा नसून नागरिकांचा आधार असते. संकटाच्या या काळात प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे. कोणालाही एकटे सोडले जाणार नाही.”
यानंतर महापौरांनी चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी इतक्या वर्षांनंतर धरणातून पाणी न सोडताही नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याची माहिती महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. नदीकाठच्या भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे तसेच परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यानंतर महापौरांनी कुदळवाडी येथील नाल्याची पाहणी केली. नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा अडकल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाला तातडीने यंत्रसामग्री व मनुष्यबळ तैनात करून कचरा हटविण्याची तसेच पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याची कडक सूचना त्यांनी केली.
याचबरोबर महापौरांनी महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून दापोडी, कासारवाडी, केशवनगर, चिंचवड, रावेत, पुनावळे आणि इतर पावसामुळे प्रभावित भागांतील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. सर्व क्षेत्रीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देत, पूरग्रस्त किंवा बाधित नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, असे आदेश त्यांनी दिले.
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनाही आवाहन करत सांगितले की, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधावा. नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी असून, या संकटाच्या काळात महानगरपालिका प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी आहे.



