समाजासमोर नवे आदर्श निर्माण व्हावेत – सोपानराव पवार

शाहूनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य हे समाजासमोर पोहोचले पाहिजे. त्यातूनच नव्या पिढीमध्ये काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा निर्माण होते. समाजात नवनवीन आदर्श निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. पुढील पिढीला काय पाहिजे हे ओळखता आले पाहिजे. वाचन संस्कार नव्याने वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रंथालय हा जीवनाचा अविभाज्य भाग होऊन ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजसेवा घडणे महत्त्वाचे आहे. ग्रंथालय चळवळीला पाठबळ देत शासन दरबारी असणारी असणारी अनास्था आपल्याला दूर करावी लागेल. माध्यमांच्या युगातही ग्रंथांचे वाचन हेच खरे शाश्वत ज्ञान आहे. त्यातूनच सशक्त समाज, वैभवशाली महाराष्ट्र आणि समृद्ध भारत घडवता येईल” असे प्रतिपादन पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांनी केले.श्री शाहू सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने “राजर्षी शाहू गौरव पुरस्कार वितरण” सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने शाहूनगर येथील शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू गौरव पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, उद्योजक रोहिदास शिंदे, विलास जेऊरकर, बालकिशन मुत्याल, साहित्यिक राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, राजगोंडा पाटील, भरत गायकवाड, कैलास दुर्गे, खजिनदार राजेंद्र पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी केले.
कामगार क्षेत्रासाठी राजेश हजारे, पर्यावरण संवर्धनासाठी डॉ. जितेंद्र होले, सामाजिक कार्यासाठी शलाका कोंडावार, शैक्षणिक क्षेत्रासाठी जयश्री घावटे, क्रीडा क्षेत्रासाठी कु. अनन्या पाटील, नारी सन्मान म्हणून डॉ. सुनिता निकम आणि मराठी भाषा संवर्धनासाठी निलाक्षी काळे-सालके यांना राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उल्लेखनीय वाचक म्हणून आर. बी. जुगदार, अनुराधा काटे ₹, आर्यन भरगुडे, आदित्य तेलंगी यांना वाचन संस्कार सन्मान प्रदान करण्यात आला
राजेंद्र घावटे यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला.
मनीषा पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पगारे यांनी सूत्रसंचालन केले.
आभार प्रदर्शन गणेश सहाणे यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन राजाराम रायकर, गोपाळ सैंधाणे, अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रवींद्र अडसूळ, सोमनाथ कुयटे, बबनराव उंदरे यांनी केले.









