‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट
गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीत बाप्पाची चांदीची मूर्ती विराजमान

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ;
गणरायाच्या पाताळातील (शेषात्मज) गणेश जयंतीनिमित्त गाभा-यात शेषनागाच्या प्रतिकृतीत बाप्पाची चांदीची मूर्ती विराजमान
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता.
गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता पं. कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने, गणेशजाग देखील पार पडला.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्र्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.
श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.









