
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यशासाठी प्रयत्नांची गरज असते, यशामुळे आपली जगणे समृद्ध होते , राष्ट्रउभारणीसाठी आपल्या व्यक्तिगत लाभापेक्षा, समाजहिताचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे प्रतिपादन किसन महाराज चौधरी यांनी केले.
थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेतील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले दिलीप थोरात, संतोष जंगम, सुनंदा सपकाळ, सुगंधा सविलगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विविध स्पर्धातील विजेत्यांचा व गुणवंत विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना श्री चौधरी पुढे म्हणाले की “प्रत्येकात एक राजहंस दडलेला असतो. त्याची जाणीव होण्यासाठी आपल्यातील सदगुणांची ओळख झाली पाहिजे. सदगुणांच्या पोषणातून व्यक्तीचा विकास होतो. त्यासाठी शिक्षकांचे योगदान मोठे ठरते.
श्री चौगुले यांनी अध्यक्षीय मनोगतात “संस्कारक्षम वयात पाठीवर पडलेली कौतुकाची थाप ही आयुष्याला उभारी देणारी ठरते, त्यामुळे बालवयात झालेले कौतुक महत्त्वाचे असते”.असे विचार व्यक्त केले.
यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ पार पडला. त्यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली. राधिका भोईटे यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा चौधर, योजना काटे, ज्योती गर्कळ, सुवर्णा बोराटे, छाया थोरात ,विद्या निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
















