
सशक्त माध्यमे हीच श्रेष्ठ विश्वनिर्मितीची आधारशिला : जयंती दीदी
आबू रोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ च्या स्वागत सत्राला देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती
आबू रोड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ या संकल्पनेवर आधारित ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ चे स्वागत सत्र बुधवारी आबू रोड येथील मानसरोवरच्या दिव्य शक्ती अनुभूती हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या सम्मेलनात भारतातील विविध राज्यांसह फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि नेपाळ येथील पत्रकार व मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
▫️आत्मिक सशक्तीकरणातून श्रेष्ठ विश्वाची निर्मिती : जयंती दीदी
ब्रह्माकुमारी संस्थेच्या संयुक्त प्रशासिका राजयोगिनी बी.के. जयंती दीदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सम्मेलनाला शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, भौतिक साधनसंपत्तीमुळे मिळणारे सशक्तीकरण वेगळे असते; मात्र या सम्मेलनात आध्यात्मिक सशक्तीकरणाचा विचार मांडला जात आहे.
“आपण आत्मिक स्वरूपात स्थित राहिलो तर आपल्या अंतर्मनातील सर्व श्रेष्ठ मूल्ये जागृत होतात. ‘मी आत्मा आहे’ ही जाणीव जीवनात धारण करून वाटचाल केली, तर श्रेष्ठ विश्वाची निर्मिती अधिक वेगाने शक्य होईल,” असे त्यांनी सांगितले.
▫️पुनीत इस्सर यांच्या गीतांनी रंगला कार्यक्रम
ब्रह्माकुमारी संस्थेसाठी २०० हून अधिक गीते सादर करणारे बी.के. पुनीत इस्सर यांनी मधुर गीतांची प्रस्तुती करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या गीतांमुळे कार्यक्रमस्थळी आध्यात्मिक आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले.
▫️मीडिया केवळ बातमी देणारे माध्यम नव्हे : डॉ. गंगाधर
‘ओम शांती मीडिया’चे संपादक डॉ. बी.के. गंगाधर यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, आज मीडिया केवळ बातम्या देण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर समाजाची विचारसरणी, दृष्टिकोन आणि दिशा प्रभावित करणारी प्रभावी व्यवस्था बनली आहे.
“समाजाला जोडणे, जागरूक करणे आणि सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात करण्याची शक्ती माध्यमांमध्ये आहे. पत्रकारितेने केवळ ‘काय घडले?’ एवढेच सांगण्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोनातून ‘काय चांगले घडू शकते?’ याची दिशाही समाजासमोर मांडली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
शांतता, सद्भावना आणि बंधुभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवून मीडिया श्रेष्ठ विश्वनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
▫️स्वागत नृत्य आणि गणेश वंदनेने वेधले लक्ष
आग्रा येथून आलेल्या श्वेता सागर यांनी सादर केलेल्या आकर्षक स्वागत नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर बंगळुरूच्या शिवशक्ती संस्कृत अकादमीच्या कलाकारांनी गणेश वंदना सादर केली. यामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
▫️बातमीसोबत समस्येच्या समाधानाची दिशाही दाखवावी : पुष्पा दीदी
राजयोगिनी बी.के. पुष्पा दीदी यांनी पत्रकारितेतील एक अनुभव सांगताना राजयोगाच्या अभ्यासामुळे त्यांच्या कार्यपद्धतीत झालेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख केला.
त्या म्हणाल्या, पत्रकाराला बातमीच्या शोधात दूरवर जावे लागते. एका प्रसंगी एका वृद्ध महिलेशी संवाद साधताना तिच्या जीवनातील वेदना आणि संघर्ष समजला. त्यावेळी केवळ त्या घटनेचे वृत्तांकन करणे पुरेसे नसून, समस्येच्या समाधानाची दिशा शोधणेही पत्रकारितेचे कर्तव्य आहे, अशी जाणीव झाली.
▫️श्रेष्ठ विश्वनिर्मितीसाठी पत्रकारांनी परमात्म्याचे सहकारी व्हावे : सरला दीदी
मीडिया विंगच्या उपाध्यक्षा बी.के. सरला दीदी यांनी सम्मेलनाचा उद्देश आणि विषय स्पष्ट केला. “परमात्म्याला सुवर्णमय, श्रेष्ठ विश्वाची निर्मिती करण्यासाठी पत्रकारांची मदत हवी आहे,” असे त्यांनी सांगितले.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या २५ सेवा प्रभागांपैकी मीडिया विंगची स्थापना १९८० मध्ये ज्येष्ठ प्रवक्ते जगदीश भाई यांनी केली. २००१ पासून मीडिया विंगने व्यापक स्तरावर उल्लेखनीय कार्य केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सध्याच्या जागतिक परिस्थितीचा विचार करून ‘श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ ही सम्मेलनाची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली असून पत्रकारांनी या श्रेष्ठ कार्यात परमात्म्याचे सहकारी आणि निमित्त बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
▫️देश-विदेशातील पत्रकारांच्या सहभागाने सम्मेलनाची भव्यता वाढली : शांतनू भाई
मीडिया व जनसंपर्क विंगचे राष्ट्रीय समन्वयक बी.के. शांतनू भाई यांनी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
“पत्रकारांच्या मोठ्या सहभागामुळे सभागृहही अपुरे पडले आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, नेपाळसह विविध देशांमधून पत्रकार येथे आले आहेत. देशाच्या मीडिया जगतासाठी हा विशेष प्रसंग आहे,” असे ते म्हणाले.
“आपण येथे केवळ बातम्या घेण्यासाठी आलेले नाही, तर चांगल्या आठवणी आणि सकारात्मक अनुभव घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. तुमचा वेळ आमच्यासाठी सन्मान आहे, तुमची उपस्थिती आमच्यासाठी आनंद आहे आणि तुमचे विचार आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी सांगितले.
▫️महाराष्ट्राच्या पत्रकारांनी दिला जय महाराष्ट्रचा नारा
सम्मेलनात विविध राज्यांतून सहभागी झालेल्या पत्रकारांचा परिचय करून देण्यात आला. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्राच्या पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत वातावरणात उत्साह निर्माण केल्याची माहिती डॉ सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक मीडिया प्रभाग यांनी दिली.
▫️राजयोग ध्यानातून पत्रकारांनी अनुभवली अंतःशांती
मागील ५८ वर्षांपासून आध्यात्मिक सेवेत कार्यरत असलेल्या आणि घाटकोपर केंद्राच्या प्रभारी बी.के. शकु दीदी यांनी मानवी मूल्यांच्या होत असलेल्या ऱ्हासाकडे लक्ष वेधले.
भारतासह संपूर्ण जगात मानवी मूल्यांची गरज वाढत असून अशा परिस्थितीत जीवनात दिव्य गुण धारण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी राजयोगाचे महत्त्व स्पष्ट करून उपस्थित पत्रकारांना राजयोग ध्यानाचा सराव करून घेतला. या ध्यानातून उपस्थितांनी अंतःशांती आणि आत्मिक शक्तीचा अनुभव घेतला.
▫️सशक्त माध्यमांतून सकारात्मक विचारांचा प्रसार आवश्यक : आत्म प्रकाश भाई
सम्मेलनाच्या अध्यक्षीय संबोधनात बी.के. आत्म प्रकाश भाई यांनी ब्रह्मा बाबांच्या एका विचाराचा संदर्भ देत सांगितले की, “पुढे जाऊन येथे अनेक लोक येतील,” असे ब्रह्मा बाबांनी सांगितले होते. आज देश-विदेशातून मोठ्या संख्येने पत्रकार येथे उपस्थित असल्याने त्यांची भविष्यवाणी प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे.
ते म्हणाले, पत्रकार आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून श्रेष्ठ आणि नवीन विश्वनिर्मितीच्या उद्देशाने येथे आले आहेत. आज जगात दुःख, अशांतता, संघर्ष आणि तणावाचे वातावरण दिसत आहे. त्याउलट सतयुगातील श्रेष्ठ संसारात नैसर्गिकरीत्या परस्परविरोधी असलेले गाय आणि सिंह यांसारखे प्राणीही एकत्र पाणी पीत होते, अशी त्यांनी आध्यात्मिक संकल्पना मांडली.
आज एका बाजूला विनाशाची तयारी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शांततामय आणि श्रेष्ठ विश्वनिर्मितीची गरज अधिक तीव्र झाली आहे. मीडिया सशक्त होऊन सकारात्मक विचार, मानवी मूल्ये, शांतता आणि सद्भावनेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवेल, तर निश्चितच श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीला हातभार लागेल, असे आत्म प्रकाश भाई यांनी सांगितले.
सर्वशक्तिमान परमात्म्याशी नाते जोडून अंतर्मनात शांती आणि शक्ती निर्माण करता येते आणि त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यात मीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.














