
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते तर गरिबी, बेरोजगारी, वैमनस्य, पैशाचा अथवा संपत्तीचा मोह, चुकीच्या संकल्पना यामुळे गुन्ह्यास प्रवृत्त होते. त्याचे कृत्य कायद्याच्या विरोधात असलेतरी कैदी हा समाजाचा अविभाज्य घटक आहे!’ असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले. दर्द से हम दर्द तक, सुप्रा लीगल फाउंडेशन, मुंबई विधी सेवा प्राधिकरण या संस्थांच्या वतीने बहाई सेंटर सभागृह, मुंबई येथे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे, फौजदारी कायदा आणि विनामूल्य कायदेशीर साहाय्य क्षेत्रातील (इंटर्नशिप) प्रशिक्षण अनुभव या दिनांक १६ मे ते १३ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण उपक्रमाच्या समारोप सोहळ्यात शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी मार्गदर्शन करताना न्यायमूर्ती श्रीराम मोडक बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पवनकुमार तापडिया, सचिव मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश साळशिंगीकर, ॲड. सुनीता खंडाळे साळशिंगीकर, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे आदी उपस्थित होते.
न्यायमूर्ती श्रीराम मोडक पुढे म्हणाले की, ‘मी न्यायाधीश म्हणून वेगवेगळ्या न्यायालयात काम केले आहे; पण दर्द से हमदर्द तक या संस्थेने कायद्याच्या कक्षेत राहूनही गरीब, निर्दोष, निरपराध अन् परिस्थितीमुळे असाहाय्य असलेल्या कैद्यांना मोफत न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या विविध मानवतावादी उपक्रमांची माहिती मला उशिरा समजली याबाबत खेद वाटतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत दोन वर्षे अभ्यास करून अस्तित्वात आणलेल्या राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. जोपर्यंत दोषसिद्धी होत नाही तोपर्यंत कोणालाही गुन्हेगार मानता येत नाही. आपल्या भारतात वेगवेगळ्या कारागृहात सुमारे पाच लाख कैदी आहेत. कोणालाही फक्त दोन तास एकाच ठिकाणी जखडून ठेवले तर असह्य होते, त्यामुळे या कैद्यांची मानसिक कुचंबणा आपल्या लक्षात येते. गुन्ह्याच्या आरोपानुसार कच्चा कैदी, पक्का कैदी, स्थानबद्ध आरोपी असे कैद्यांचे वर्गीकरण केले जाते. अशावेळी नातेवाईक, मित्र, राजकीय पक्ष त्या कैद्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करीत असतात; परंतु काहीवेळा जामीनपात्र गुन्हा असूनही दुर्दैवाने कोणीही पाठीशी नाही अशा अभागी कैद्यांना तुरुंगात खितपत पडावे लागते. अशा कैद्यांबाबत केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून मोफत कायदेशीर साहाय्य करणाऱ्या दर्द से हमदर्द तक या संस्थेचे कार्य खरोखरच स्तुत्य आहे. वकील होण्यासाठी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण दिले जाते; मात्र प्रत्यक्षात काम करताना ते पुरेसे नाही हा अनुभव नवोदित वकिलांना येतो. या पार्श्वभूमीवर आरोपीची दुसरी बाजू मांडण्याचे, कैद्यांप्रति संवेदनशीलता बाळगण्याचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असते; आणि अशा उपक्रमांमुळे ते ज्ञान अन् दृष्टी प्राप्त होते!’ न्यायाधीश म्हणून वेगवेगळ्या न्यायालयात केलेल्या कामांचे वैविध्यपूर्ण अनुभव कथन करीत न्यायमूर्ती मोडक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. प्रकाश साळशिंगीकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेने तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची माहिती देताना कारागृहातील कैद्यांसाठी मोफत खटला चालवण्यासाठी व जामीन देण्यासाठी केलेली मदत, विनामूल्य समुपदेशन केंद्र, कायदेशीर जागरुकता वाढविणे, गोरगरिबांसाठी वकील आपल्या दारी हा राबविलेला विनाशुल्क उपक्रम आदींची माहिती दिली. ॲड. आशि नारायण यांनी इंटर्नशिप प्रोग्रामबाबत सविस्तर आढावा घेतला.
यावेळी न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी, ॲड सुहास पडवळ, ॲड. गणेश नागरगोजे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. भूषण पाटील, ॲड ओंकार पाटील, ॲड .विघ्नेश्वर सुब्रह्मण्यम, ॲड नितीन हजारे हे उपस्थित होते. ॲड. सायली वाणी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले.



