अव्यवस्थित खोदकाम, अनधिकृत पार्किंग व वाहतूक कोंडीमुळे रस्ते धोकादायक; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे, वाहनांची वाढती व अनियंत्रित वाहतूक, परवान्याशिवाय सुरू असलेली दुकाने तसेच रस्त्यांवर होणारे अनधिकृत पार्किंग यामुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांमुळे दररोज वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले असून कामे संथ गतीने सुरू असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. खोदकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, इशारे किंवा दिशादर्शक फलक नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय, मुख्य रस्त्यांलगत काही व्यावसायिक आस्थापनांनी पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था न केल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. काही दुकाने आवश्यक परवान्यांशिवाय सुरू असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, वाहतूक पोलीस, महापालिका आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अनधिकृत पार्किंग हटवावे, बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करावी आणि खोदकामाची कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच रस्ते सुरक्षित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील वाढत्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

