जनसंवाद अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या ऐकून उपाययोजना सुरू

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाचा पुढचा टप्पा सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांमध्ये पार पडला. या भेटीदरम्यान आमदारांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा जाणून घेतल्या.
ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी जागेची अडचण दूर करून घंटागाडीची मागणी, इंदोरी–जांबवडे रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे, प्रधानमंत्री आवास योजनेत राहिलेल्या लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा, प्रस्तावित रेल्वे लाईनसंदर्भात शेतकऱ्यांच्या शंका व भूमिका, रेशनिंगमधील अडचणी, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांमधील अडथळे व वाढीव कामाची मागणी, लाडकी बहीण व संजय गांधी योजनांचे वंचित लाभार्थी तसेच जातीचे दाखले व इतर शासकीय दाखल्यांशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता.
नागरिकांनी या समस्या तोंडी तसेच लेखी स्वरूपातही मांडल्या. प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची दखल घेऊन संबंधित विभागांमार्फत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले. गावोगाव जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या तातडीने मार्गी लावणे हीच आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे लोकांमध्ये आमदार सुनील शेळके हे ‘समस्या गांभीर्याने घेणारे आणि तत्परतेने उपाययोजना करणारे लोकप्रतिनिधी’ अशी ठाम भावना निर्माण झाली आहे.
यावेळी जांबवडे गावातील ठाकर बांधवांना जातीची २० प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत जनसंवाद अभियानामुळे सामान्य जनतेच्या समस्या शासनदरबारी पोहोचत असल्याचे समाधान व्यक्त केले.













