ताज्या घडामोडीपिंपरी

टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित शहर उभे करणार

शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय पीएमआरडीए पुढील प्रक्रिया करणार नाही

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील ६५.०० मी. रुंद बाह्यवळण रस्त्यांचे क्षेत्र मिळण्यासाठी नव्याने नगर रचना योजना कार्यान्वित करण्यासाठी मान्यता द‍िली आहे. त्यानुसार धामणे, गोदुंबरे, दारूंबरे, साळुंब्रे, सांगवडे या गावांमधील प्रस्तावित नगर रचना योजनेबाबतच्या तरतुदींची माहिती देणे, धोरणात्मक बाबी समजावून सांगणे, नगर रचना योजनेच्या इराद्याबाबत, क्षेत्राबाबत व नकाशाबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि.१४) प्राधिकरण कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या योजनेमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचे भूसंपादन करण्यापूर्वी त्यांच्या शंकांचे निरसन आणि समन्वयातूनच पुढील प्रक्रिया राबवणार असल्याची ग्वाही महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. नव्याने मंजूर झालेल्या टीपी स्कीमच्या अंमलबजावणीसंदर्भात आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली, यावेळी महानगर आयुक्त बोलत होते.

वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगाने शासनाकडून टप्याटप्याने टीपी स्कीम मंजूर होत आहे. याची अंमलबजावणी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून मावळ तालुक्यातील धामणे, गोदुंबरे, दारुंबरे/ साळुंब्रे, दारुंबरे/ साळुंब्रे, सांगवडे, नेरे आदी गाव परिसरात या योजनेची आखणी करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन त्यांच्या संमतीशिवाय करणार नाही. यासह त्यांच्या शंकांचे निरसन झाल्याशिवाय तसेच समन्वयाशिवाय कुठलाही शेतकऱ्यांचे जमिनीचे भूसंपादन करणार असल्याचे यावेळी महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी स्पष्ट केले. बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित शहर उभे करणार असल्याने याचा सर्वांना लाभ होणार असून अपेक्ष‍ित सोयीसुव‍िधा उभारण्यात येणार असल्याचे डॉ. म्हसे यांनी स्पष्ट केले.

आमदार सुनील शेळके यांनी संबंध‍ित टीपी स्कीम राबवताना कुठल्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना केली. याशिवाय समन्वय आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतरच भूसंपादन प्रक्रियेसाठी पुढे यावे. या टीपी स्कीम योजनेची आखणी निर्धारित वेळेत कसे करता येईल, शेतकऱ्यांना अपेक्षित मोबदला देण्यासंदर्भात तातडीने शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

या बैठकीत नगररचना विभागाच्या सह महानगर नियोजनकार श्वेता पाटील यांनी सादरीकरणाद्वारे शेतकऱ्यांना टीपी स्कीमबद्दल माहिती दिली. यासह योजनेची रूपरेषा आणि योजनेची अंमलबजावणी कशी करणार, याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. या बैठकीला आमदार सुनील शेळके, एमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी आणि नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button