विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त एकनाथ उगले आणि रवींद्र रायकर यांचा सन्मान

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त एकनाथ उगले आणि रवींद्र रायकर यांचा सन्मान (Vishwakarma Meritorious Worker Awardees Eknath Ugle and Ravindra Raikar honored) महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांच्यावतीने पद्मश्री आणि पद्मभूषण अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि कार्याध्यक्ष राजेंद्र वाघ आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी अण्णा हजारे यांनी सोबत असलेल्या कुमारी वैष्णवी उगले यांच्याशी संवाद साधताना आपल्या मनोगतात असे म्हटले “स्री पणाचे गाठोडे बाजूला ठेवून देशकार्यात पुढे आले पाहिजे.आजचा युवक हा देशाचा आशावाद आहे. त्यांच्यावरच भारताचे भविष्य अवलंबून आहे. म्हणून आजच्या युवकाला सुसंस्कृत करून देशसेवेचे व्रत घेण्यास सक्षम करणे काळाची गरज आहे. यासाठी समाजातील तरुण पिढीने आपले जीवन कार्य हेच देशकार्य म्हणून सुरू करायला पाहिजे तसेच स्त्री पुरुष असा लिंगभेद न मानता तरुण मुलींनी निसंकोचपणे धडाडीने कर्तव्य पार पाडावेत. आज-काल सर्वच सुखाच्या मागे धावत आहेत. सुखाचा पत्ता चुकल्यामुळे तरुणांची दिशाभूल होत आहे, त्यामुळे तरुण पिढीला दुःखाला सामोरे जावे लागत आहे. तरुण पिढीकडून सकारात्मक भूमिकेची आशा आहे. देशासाठी त्यागभावना व देशप्रेम भावना जागी होण्यासाठी निष्कलंक चारित्र्य जोपासता आले पाहिजे . तरुण पिढीकडून माझ्या भरपूर अशा अपेक्षा आहेत.
विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्याने आज अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांचा आशीर्वाद मिळाल्याने खऱ्या अर्थाने श्रमाला प्रतिष्ठा मिळाली अशी भावना थरमॅक्स ली. कंपनीचे एकनाथ उगले यांनी व्यक्त केली.
विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त कमिन्स कंपनीचे रवींद्र रायकर यांनी यावेळी श्रमाची प्रतिष्ठा आम्ही कायम राखण्यास कटिबद्ध आहोत अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी सौ निकिता रायकरआणि सौ रंजना वाघ आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.










