ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
उरणमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्व यंत्रांनांनी समनव्य साधून पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत. नालेसफाईला गती द्यावी. उरण शहरात समुद्राचे पाणी येणार नाही, याची काळजी घ्यावी. जेथे पाणी येते, त्याठिकाणी भराव टाकावा. झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
रेल्वे स्थानकाच्या आढावा घेतल्यानंतर आता खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. सोमवारी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत उरण येथील पंचायत समितीत आढावा बैठक झाली. सिडको, सार्वजनिक बांधकाम, जेएनपीटी, तहसील, वैद्यकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उरणचे तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, उरण नागरपरीषद मुख्याधिकारी समीर जाधव, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसळ, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, शिवसेना तालुका प्रमुख उरण दिपक ठाकूर, शिवसेना विधानसभा संघटक मनोज घरत, महिंद्र पाटील, उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेघाताई दमडे, शहर प्रमुख सुलेमाण शेख व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकही उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पावसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत. नालेसफाईला गती द्यावी. समुद्राचे पाणी येते, त्याठिकाणी भराव टाकावा. झाडांची छाटणी करावी. खराब झालेले विद्युत पोल दुरुस्त करावेत. पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. गेल्या वर्षभरात ५४ नागरिकांना सर्पदंश झाला आहे. १२५ हून अधिक नागरिकांना मोकाट श्वानाने चावा घेतला आहे. त्याची लस उपलब्ध ठेवावी. वैद्यकीय कर्मचारी वाढवावेत. डास होऊ नयेत यासाठी वेळोवेळी धुरीकरण करावे. जलजीवन अंतर्गत नऊ प्रकल्प सुरू आहेत. त्याला गती द्यावी. विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून सुर्यघर, कुसुम योजनेबाबत जनजागृती करावी. या योजनेचा नागरिकांना जास्तीत जास्त लाभ द्यावा. पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या कामाचा दर्जा चांगला ठेवावा. काम पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना द्यावा. रस्त्यावरील खड्डडे बुजवावेत. अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.









