तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण
नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -त्रिरत्न बौद्ध महासंघ, पिंपरी केंद्राच्या वतीने नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या धम्मानुस्मृती विहार चे उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात उत्साहात पार पडले. या विहाराच्या नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी माननीय आमदार अमित गोरखे यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आला होता.
या धम्मविहाराची मूळ संकल्पना सन १९९२ मध्ये साकारण्यात आली होती. तब्बल ३३ वर्षांनंतर, नव्या स्वरूपात व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा हा धम्मविहार पुन्हा एकदा समाजाच्या सेवेसाठी नव्या रुपात खुला करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सांगितले, “माझ्या आमदार निधीतून बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या बौद्ध विहारासाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाले, हे माझ्यासाठी अत्यंत गौरवाचे आहे. मागील ३३ वर्षांपासून या विहाराकडे कोणी लक्ष दिले नव्हते. हा उपक्रम म्हणजे माझे एक मोठे सामाजिक कर्तव्य आहे. धम्मप्रिय बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मला अत्यंत आनंद झाला.”
ते पुढे म्हणाले, “जर आपल्या सगळ्यांची अशीच साथ मिळत राहिली, तर लवकरच या ठिकाणी स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC आणि UPSC च्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका देखील उभारली जाईल. हा बौद्ध विहार धार्मिक तसेच सामाजिक कार्यांसाठी उपयुक्त ठरणार असून आपल्या मुलांचे उज्वल शैक्षणिक भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. हे विहार इतर विहारांसाठी एक आदर्श ठरेल.”
“हे केवळ विकासाचे काम नाही, तर माझे सामाजिक कर्तव्य आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
धम्मविहाराच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना बौद्धिक, नैतिक व समतेच्या मूल्यांची जाणीव करून देण्याचा उद्देशही स्पष्ट केला आहे.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांमध्ये दिपक मेवानी, सौ. कोमल मेवानी, राजकिरण दाभाडे, जयेश चौधरी, महादेव सोनवणे, रंगनाथ साळवे, रणजीत कांबळे, शिवा पिल्ले, मारुती सोनटक्के हे पदाधिकारी सामील होते.









