ताज्या घडामोडीपिंपरी
अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य तरुण पिढीला माहिती व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भाजयुमो'तर्फे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त युवा प्रेरणा संवाद

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपल्याला शिकवल्या गेलेल्या इतिहासात मुघल गेल्यावर थेट ब्रिटिश आले आणि राज्य केले असे सांगितले जाते. पण ते चुकीचे आहे. दरम्यानच्या १०० ते १२५ वर्षात वेगवेगळ्या स्वरूपात ठिकठिकाणी राज्यकारभार सुरु होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्ष उत्कृष्ट कारभार चालवला. त्यांच्या कारभारात सामान्य माणूस सर्वप्रथम होता. अहिल्यादेवी महाराणी होत्या. त्यांच्या नावाने राज्यात अनेक योजना सुरू केल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य तरुण पिढीला माहिती व्हायला हवे,” असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे आमदार व महासचिव विक्रांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार हेमंत रासने, आमदार शंकर जगताप, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, निखिल चव्हाण, योगेश मेंद, महिला शहराध्यक्ष निवेदिता एकबोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ, संदीप सातव, सचिन जायभाये, कुणाल टिळक, प्रिया पवार, भैरवी वाघ, अमृत मारणे, कुणाल मराठे,अजित कुलथे, अजिंक्य टेकवडे, ललिता जाधव, संग्राम बर्गे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आलो. ३०० वर्षांनंतरही त्यांच्या कारभाराची आठवण काढली जाते. कारण देशात होणाऱ्या परकीय आक्रमणांना मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. भारतीय समाज एकसंध असून, आध्यात्मिक ताकद प्रबळ आहे. त्यामुळे आपली संस्कृतीची मानके तोडण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आक्रमणांनी केला. भारतीयाची शक्तिस्थळे, देवस्थाने नष्ट करण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशातील पुण्यस्थळे आणि शक्तीस्थळे, घाटांचे पुनर्जीवन करण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच आज सर्व ज्योतिर्लिंग शाबूत आहेत.”
“औरंगजेबासारख्या नालायक लोकांनी आपली मंदिरे उद्ध्वस्त करण्याचे काम केले. आपल्या संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यात अहिल्यादेवी यांचा मोठा वाटा आहे. अनेक चांगले उत्कृष्ट जलशास्त्र वापरून जलसंधारणाचे काम त्यांनी केले. एक कर पद्धत लावून सामान्यांना दिलासा दिला. योग्य दुष्काळ नियोजन केले. राज्यकारभार चालवताना अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचे काम त्यांनी केले. महेश्वरी येथे बाहेरून विणकर आणून नवीन बाजारपेठ निर्माण केली. चांगले आयात-निर्यात धोरण बनवले व राबवले. त्यांनी देशभरात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक खर्चातून स्थापत्य कामे केली. साधी जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने केलेल्या कारवाईबाबत दोन महिला माहिती देत होत्या. या महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले. हे अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचे प्रतीक आहे. आत्मनिर्भर भारताचे महत्व अहिल्यादेवी यांनी त्याकाळात ओळखले होते. शस्त्रनिर्मिती कारखाने त्यांनी तयार केले. त्यांच्या राज्याला कोणी कधी नख लावू शकले नाही. जातीपातीचे राजकारण न करता त्यांनी पारदर्शकपणे कारभार केला. त्यांची न्यायव्यवस्था व्यक्ती निरपेक्ष होती. कायदा आणि सुव्यस्था राज्य त्यांचे मानले जाते, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
आमदार विक्रांत पाटील म्हणाले, “१८२५ ते १७९० दरम्यान ७० वर्ष अहिल्यादेवी होळकर यांचा कार्यकाळ आहे. त्यांचे काम तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी भाजप काम करत आहे. आधीच्या ६० वर्षात सत्ता उपभोगणाऱ्यांनी अहिल्यादेवी यांचे कार्य समोर आणले नाही. बहुजन समाजासाठी त्यांचे काम प्रेरणादायी आहे. त्यांचा संघर्ष, कार्यपद्धती घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. इतिहासात ज्यांनी संघर्ष केला, त्या सर्व महापुरुषांच्या नेतृत्त्वातून आमचे आजचे नेते काम करत आहेत. अध्यात्मिक भावना जपतानाच समाजाच्या प्रश्नासाठी रणरागिणी होण्याचे कामही व्हायला हवे.”पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी संपूर्ण भारतवर्षांत अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, त्याप्रमाणेच त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा, यासाठी औद्योगिक धोरण आखले, अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. यासह त्यांनी अनेक उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. त्यांचे हे कार्य व आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन घेऊन वाटचाल करत आहेत. आगामी मनपा निवडणुकीत युवा मोर्चाचा सिंहाचा वाटा असेल, असे मत अनुप मोरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण मिसाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता एकबोटे यांनी केले.









