ताज्या घडामोडीपिंपरी

आषाढीवारी पालखी सोहळ्याचे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करा- आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड महापालिकेत पार पडली नियोजन बैठक

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखीचे १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचे २० जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेसह इतर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपसात समन्वय ठेवून सोहळा यशस्वीपणे पार पाडावा, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती, संत तुकाराम महाराज देवस्थान समिती, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट यांच्यासह महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महावितरण, देहू नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, अन्न व औषध प्रशासन, परिवहन आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, विजयकुमार काळे, अजय सूर्यवंशी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उपायुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, मनोज लोणकर, राजेश आगळे, निलेश भदाणे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अमित पंडित, पूजा दुधनाळे, शीतल वाकडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य पशु संवर्धन अधिकारी डॉ. अरुण दगडे, पिंपरी चिंचवडचे पोलीस उप आयुक्त बापू बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ, शत्रुघ्न माळी, अशोक कडलग, निलेश वाघमारे, अपर तहसीलदार जयराम देशमुख, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगर अभियंता संजय गिरमे, देहू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, पिंपरी चिंचवडच्या वाहतूक निरीक्षक सविता पवार, महामेट्रोचे प्रकल्प अधिकारी संदीप दुसे, महावितरण सहकार्यकारी अभियंता बजरंग बाबर, श्री क्षेत्र आळंदी संस्थान विश्वस्त ॲड.रोहिणी पवार, श्री क्षेत्र देहू संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. वैभव महाराज मोरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे आप्पा बागल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे प्रमोद कुटे, पिंपरी येथील जोग महाराज दिंडीचे जयवंत शिंदे, माजी नगरसेवक सुरेश भोईर आदींचा समावेश होता.

महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यानिमित्त केलेले आणि करण्यात येणाऱ्या नियोजनाबद्दल सादरीकरणाद्वारे बैठकीमध्ये माहिती देण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाने पालखी सोहळ्याच्या निमित्त पिंपरी चिंचवड शहरात केलेल्या नियोजनाची देखील माहिती देण्यात आली. इतर आस्थापनांकडून देखील पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती बैठकीत देण्यात आली.

श्री क्षेत्र आळंदी संस्थान, श्री क्षेत्र देहू संस्थान, महाराष्ट्र वारकरी महामंडळ, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट आदींकडून विविध सूचना बैठकीत मांडण्यात आल्या. यामध्ये पालखी मार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, पालखी मार्गावर ठिकठिकाणी पिंक टॉयलेटची व्यवस्था करावी, मोटार सायकल रुग्णवाहिका पालखी सोबत द्यावी, पुरेसे स्वच्छतागृह आणि स्नानगृहे उपलब्ध करून द्यावीत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून पालखी सोहळा काळात अशा पथकांची संख्या वाढवावी, आवश्यक ठिकाणी बॅरिकेटस् व्यवस्था करावी, पालखी मार्गावर काम सुरू असलेल्या ठिकाणी संरक्षक उपाययोजना कराव्यात, वीज खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी, पालखी सोहळ्याला अडथळा ठरणाऱ्या वृक्ष फांद्यांची छाटणी करावी, पालखी मार्गावर अथवा मुक्कामाच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्यावी, पालखी मुक्काम आणि पालखी मार्गावर स्थापत्य व विद्युत विषयक आवश्यक सर्व कामे करावीत, पिण्याच्या पाण्याची पुरेसी व्यवस्था असावी, दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वारकरी भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी सूचना मांडण्यात आल्या.

आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत आलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित विभागांना यावेळी दिले. पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच पालखी सोहळ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या विविध समित्यांच्या प्रतिनिधींशी समन्वय ठेवून वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची संबंधित विभागांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले.
पालखी सोहळ्यानिमित्त पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधा, पुरेशा फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पावसाळ्याच्या अनुषंगाने आवश्यक आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे सिंह म्हणाले. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. पालखी मार्गाची वेळोवेळी पाहणी करुन खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या पार्कीगच्या जागी पार्कींग संदर्भातील फलक तसेच महापालिकेमार्फत वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांसंदर्भातील फलक लावण्यात यावेत. पालखी मार्गावर दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावावेत. पालखीच्या मार्गावर व कार्यक्रमांच्या ठिकाणी, मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई, जंतुनाशक फवारणी करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button