संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त आळंदीत अखंड हरिनाम सप्ताहाचे उदघाटन
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (७५० वा) सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त अलंकापुरीत उत्साही मंगलमय, धार्मिक, भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदायास साजेसा अखंड हरिनाम सप्ताह अंतर्गत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ डॉ. नारायण महाराज जाधव यांचे हस्ते हरिनाम गजरात झाला. हजारो वारकरी, भाविकांनी प्रतिसाद देत सोहळ्यात सहभागी झाले.
आळंदीतील या सोहळ्यास भल्या पहाटे उद्घाटनास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, डॉ. नारायण महाराज जाधव, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, आमदार बापूसाहेब पठारे, मुक्ताईनगर देवस्थानचे प्रमुख रवींद्र भैय्या पाटील, पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त राजेंद्र उमाप, डॉ. भवार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, विश्वस्त रोहिणी पवार, विश्वस्त पुरुषोत्तम दादा पाटील, माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, वैजयंती उमरगेकर, बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय घुंडरे, आळंदी ग्रामस्थ, वारकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याचे उदघाटन प्रसंगी विना पूजन, प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन वेदमंत्र जयघोषात झाले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील ग्रंथ पूजन प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे हस्ते हरिनाम जयघोषात झाले. यावेळी पारायण नेतृत्व कोष्टी महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून केले. पहिल्या दवशी पहिले तीन अध्याय पारायण घेण्यात आले. आळंदी भक्तीनगरी भाविकांचे स्वागतास सजली असून विविध ठिकाणी कमानी, माउली मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली. धार्मिक पर्वणी भाविकांना लाभली आहे. ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक महिला बचत गटातील महिला, शाळांतील विध्यार्थी, शिक्षकांनीही या पारायण सोहळ्यात सहभाग घेतला आहे.सोहळ्यात पहाटे सहा ते रात्री अकरा या वेळात विविध कार्यक्रम होणार आहेत. यात पारायण, कीर्तन, चरित्र कथा चिंतन, प्रवचन, हरिपाठ, संगीत भजन आदींचा समावेश आहे. सोहळ्यातील ज्ञान यज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. आळंदी देवस्थान चे वतीने माऊलींची प्रतिमा देत मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
ज्ञानेश्वरी आचरणात आली पाहिजे :- ना.चंद्रकांत पाटील
या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सोहळयास सद्दिच्छा दिल्या. ते म्हणाले,
श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास एवढ्या पहाटे पासून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशे व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त तसेच संत नामदेवांच्या ६७५ व्या समाधी वर्षे, संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या सदेह वैकुंठ गमना वर्ष पूर्ती निमित्ताने तीनही योग आलेत. येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत आहे. या सोहळ्याचे आयोजनात संस्थान आणि गावकरी यांचा सोहळ्यात समन्वय दिसत आहे. त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो. ज्ञानेश्वरीवर बोलण्याची माझी पात्रता नाही. मात्र ज्ञानेश्वरीचे जवळ आहे. मी आज जो आहे तो चौथ्या वर्षी कळत नव्हतं अशा वेळेला निरक्षर सही पण करता न येणाऱ्या वडिलांनी ज्ञानेश्वरी वाचनाचा आग्रह झाला. काहीच कळत नव्हतं. तेव्हापासून सातत्याने ज्ञानेश्वरी वाचनाचा माझ्यावर परिणाम आहे. ते म्हणाले, ज्ञानेश्वरी वाचताना ती समजली पण पाहिजे. आणि आचरणात पण आली पाहिजे. समजल्या शिवाय आचरणात आणता येत नसल्याचे त्यांनी असे सांगत ते दहा मिनिटे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणात ज्ञानेश्वरी वाचण्यास बसले.









