चिंचवडताज्या घडामोडीनवरात्री विशेषपिंपरी

राजकारण आणि समाजकारण क्षेत्रातील नवदुर्गा – अनुराधा गोरखे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या ज्येष्ठ माजी नगरसेविका  अनुराधा गोरखे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या अनुराधा राघू चखाले यांचा येरवडा येथे १० सप्टेंबर १९५७ रोजी जन्म झाला. शिक्षणाची आवड असल्यामुळे घरच्या गरिबीच्या परिस्थितीतून मार्ग काढून जिद्दीने आत्मविश्वासाच्या व मेहनतीच्या जोरावर त्यांनी जुन्या काळातील अकरावी म्हणजेच मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे गणपतराव गोरखे यांच्याशी लग्न झाले.

आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीत देखील सासू-सासरे, दोन नणंदा आणि तीन मुलांचे डोळस संगोपन अशा सर्व सांसारिक जबाबदाऱ्या त्यांनी जिद्दीने सांभाळल्या.काळभोर नगरच्या मनपा शाळेत मुलांचे शालेय शिक्षण चालू असताना मुलांना निबंध लेखन, वक्तृत्व व शालेय अभ्यासात त्या उत्तम मार्गदर्शन करत असत. आणि मुलांची प्रगती जाणून घेण्यासाठी शिक्षकवर्गाशी संवाद साधत असत. यादरम्यान तेथील मुख्याध्यापक मा. दामले सरांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातील आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची तळमळ हे गुण ओळखून त्यांना बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करण्यासाठी प्रवृत्त केले. हा त्यांच्या व पर्यायाने कुटुंबाच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग ठरला.

हा कोर्स करून अनुराधाताईंनी १९८४ च्या दरम्यान चिंचवड मधील C.M.S. School मध्ये अध्यापनाला सुरुवात केली. त्यासोबतच मुलांसाठी शिकवणी वर्ग घेतले. काळभोरनगर येथे वास्तव्याला असताना त्यांनी पोस्ट, विविध पतसंस्थांमध्ये बचत खाते एजंट म्हणून काम करून संसाराला हातभार लावला. यानिमित्ताने पालकवर्गाशी तसेच सर्वसामान्य लोकांशी सहजतेने आणि आपुलकीने संवाद साधण्याची त्यांची शैली, मनमिळाऊ स्वभाव, बुद्धिमत्ता, शिक्षणाविषयीची तळमळ, समाजकारणाची आवड, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य या गोष्टींमुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क तयार झाला. यातूनच त्या लोकाग्रहास्तव २०१७ साली भारतीय जनता पक्षातून निवडणुकीला उभ्या राहिल्या. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अ प्रभाग च्या अध्यक्षा, शहर सुधारणा समिती चेअरमन, विधिसमिती व जैवविविधता समिती सदस्य अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. या सर्व कार्यकाळात त्यांनी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले. चिंचवड स्टेशन जवळ लहुजी वस्ताद यांचा पुतळा उभारला. बर्ड व्हॅली उद्यान, संभाजीनगरचा विकास केला व शाहूनगर के.एस.बी. चौकात आता नागरिकांसाठी उद्यान विकासाचे काम चालू आहे. परिसरात फायबर टॉयलेट उभारून स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेतली. प्रत्येक वॉर्डमध्ये कामगारांसाठी केबिन उभारून त्यांच्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून दिली. तसेच स्वच्छता कामगारांसाठी हातमोजे,बूट अशा पायाभूत सुरक्षेच्या वस्तू मिळवून देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. आणि पगार वाढवून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला. विविध ठिकाणी स्वच्छता अभियान, जलबचत अभियान राबवले. संसाधनांचा योग्य वापर व्हावा, पाणी वाया जाऊ नये याकडे त्या जातीने लक्ष देतात. आपले शहर स्वच्छ सुंदर दिसावे आणि पर्यावरण जपावे याकडे त्यांचा कटाक्ष असतो. झाडांवर खिळे ठोकू नयेत तसेच जाहिरात फलक लावू नयेत यासाठी त्यांनी समाज जागृती केली. वटपौर्णिमेला वटवृक्षाभोवती गुंडाळलेले दोरे दुसऱ्या दिवशी कापून वृक्षांचा श्वास मोकळा केला. त्यांच्या नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात जवळपास एक हजार झाडे लावून त्यांचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी पेलली. आणि निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण जपण्याच्या मोहिमेत मोलाचा हातभार लावला.
त्यांनी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध तपासणी शिबिरांचे आयोजन केले. दरवर्षी शिक्षणासाठी पाच विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शालांत परिक्षेपर्यंतचा सर्व खर्च त्या करतात. तसेच कोरोना काळात कोव्हिड रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन इस्पितळात दाखल केले आणि योग्य औषधोपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचवले. तसेच या काळात गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करून आणि भोजन व्यवस्था करून त्यांना मदत केली. असे अतिशय मोलाचे समाजोपयोगी कार्य त्या करत आहेत.

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील या धडाडीच्या कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाचा गौरव आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार, सामाजिक विकास पुरस्कार, पिं.चि.मनपा.कार्यक्षम नगरसेविका पुरस्कार, शामची आई पुरस्कार, पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुरस्कार, या आणि अशा विविध मानाच्या पुरस्कारांनी करण्यात आला आहे. त्या जिजामाता पतसंस्था, काळभोरनगरच्या तीस वर्षे संचालिका व खजिनदार आहेत. तसेच पंचवीस वर्षे श्री गजानन लोकसेवा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा व चेअरमन अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांवरून त्यांनी कार्य केले आहे. नुकताच ६६ बॅंकामधून उत्कृष्ट संचालिका पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षणाने माणसाच्या आयुष्यात आमुलाग्र क्रांती घडते हे त्यांनी स्वतः अनुभवले. म्हणूनच त्यांनी मुलांना सुसंस्कार, उत्तम आचारविचार देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि आयुष्याची जडणघडण केली. त्यांच्यातील जिद्द, चिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, आत्मविश्वास आणि शिक्षणाची ओढ, नेतृत्व गुण, सामाजिक बांधिलकी, राजकारण आणि समाजकारणाची आवड हे गुण त्यांच्या मुलांमध्ये उतरले आहेत. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र मा.अमोलजी गोरखे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागात महत्त्वाच्या पदावरून मोलाचे कार्य करत आहेत. आणि दुसरे सुपुत्र मा. अमितजी गोरखे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उच्च योगदान देत आहेत. भारत सरकारच्या युवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलेले हे व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवड चे ‘युथ आयकॉन’ आहेत. आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ते विधान परिषदेत आमदार म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. आणि आपल्या कर्तबगार मातेचा राजकीय वारसा पुढे नेत आहेत. त्यांची कन्या सौ.अश्विनी सचिन शेंडगे या मराठी चित्रपटविश्वात अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या सुविद्य स्नुषा अश्विनी(गायत्री) आणि डॉ.प्रिया या कुटुंब, मुलांचे संगोपन आणि नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल आणि NIBR College of Hotel management , निगडी या गोरखे कुटुंबीयांच्या शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर यशस्वीरित्या कार्यरत आहेत.
शिकेल तो टिकेल, मुलांना शिकवा, तरच कुटुंबाची, समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची प्रगती होईल असा संदेश त्या देतात.
अशा या कर्तृत्वशालिनी व्यक्तिमत्त्वाचे त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकारण, समाजकारण या सर्वच क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि निरामय दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा.

लेखन-  माधुरी शिवाजी विधाटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button