पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आदरणीय अशोकजी सिंघल यांनी आपल्या समर्पित योगदानातून हिंदू धर्माचा स्वाभिमान जागृत केला; पण धर्म टिकून राहण्यासाठी आर्थिक सक्षमता महत्त्वाची असते!’ असे विचार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी कामशेत येथे व्यक्त केले.
श्री अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट, मुंबई संचालित कामशेत येथील ग्रामदूत प्रकल्पा अंतर्गत आर्थिक साक्षरता व महिलांचे आर्थिक सबलीकरण या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मिलिंद परांडे बोलत होते. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद अध्यक्ष प्रा. गजानन धारणे, अनिरुद्ध पंडित, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, संस्थेचे विश्वस्त सुरेश पंसारी, मनमोहन गोयंका, पवन पोदार, बालकिशन अगरवाल, श्याम गुजरपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
मिलिंद परांडे पुढे म्हणाले की, ‘अजूनही ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्योत्तर काळातही बरेचसे भारतीय वावरताना दिसतात. वास्तविक साधूसंत आणि देशभक्तांनी समाजाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. अशोकजी सिंघल यांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू समाजात चैतन्य निर्माण केले. धर्म आणि संस्कृतीशिवाय समाज एकसंध राहू शकत नाही. आदरणीय अशोकजींच्या नावाने कार्यरत असलेल्या या संस्थेचे आर्थिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रांसह शिक्षण, आरोग्य, पाणी या मूलभूत सुविधांसाठी असलेले कार्य अतिशय स्तुत्य आहे. या अंदर मावळ परिसरातील सुमारे छप्पन गावे आणि तीन वस्त्यांमधील सर्वांगीण विकासासाठी ही संस्था सातत्याने तीन वर्षांपासून कार्यरत आहे. या कामाची व्याप्ती सर्वदूर पोहोचली पाहिजे. हिंदू समाजाचा जन्मदर कमी होतो आहे, ही गंभीर बाब आहे. जनगणनेत धर्माचा उल्लेख ‘हिंदू’ करायला विसरू नका!’ मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गवळी यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पंसारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कांचन राळे (संगणक), पूजा जाधव (शिवणकाम), वर्षा चव्हाण, अश्विनी केंगले, अर्चना इंगळे, सायली शिंदे (गृह उद्योजिका), संध्या शिंदे (स्वविकास केंद्र) आणि स्तनदा माता श्रद्धा जाधव यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. सोनम राणे यांनी सूत्रसंचालन केले.

