स्मार्ट सारथीवरील नागरिकांच्या तक्रारी योग्य कार्यवाही न करता बंद केल्यास होणार कठोर कारवाई! आयुक्त शेखर सिंह यांचा इशारा

सर्व विभागप्रमुखांना तक्रारींचे समाधानकारक निराकरण करण्याचे आदेश
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवून एकूणच पायाभूत सुविधांची पुर्तता करून राहणीमान सुधारण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, व नागरिकांना या सेवांमुळे मिळणारे समाधान आणि महानगरपालिकेचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व जोपासण्यासाठी, महानगरपालिकेने सर्वसमावेशक यंत्रणा सुरू करुन स्मार्ट सारथी तक्रार निवारण प्रणालीमध्ये सकारात्मक बदल केले आहेत. यापुढे सारथीवर आलेल्या तक्रारींवर समाधानकारक कार्यवाही झाल्याबाबत तक्रारदारालाच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा करण्यात येणार आहे. तसेच तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने केलेल्या कामाचे मुल्यांकन करण्यात येणार आहे.
तक्रारदाराने केलेल्या तक्रारीचे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून निवारण करून ती बंद केल्यानंतर त्याबाबत संबंधित तक्रारदाराचे समाधान झाले की नाही, यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सेवा वितरणातील तफावत ओळखण्यासाठी महानगरपालिकेकडून तक्रारदाराला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय घेण्यात येणार आहेत. याचबरोबर, नागरिकांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास संबंधितांची चौकशी किंवा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच समस्यांचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे.
चौकट – मागील महिन्यामध्ये ८,०७६ तक्रारींचे निरसन









