सार्वजनिक कामांबरोबरच महेश लांडगे नेहमी वैयक्तिक अडचणीला ही धावतात – जितू यादव यांचे प्रतिपादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आमदार महेशदादा लांडगे सार्वजनिक कामांबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या वैयक्तिक अडचणीच्या वेळी धावून जातात. कोणात वाद असतील तर ते वाढविण्यापेक्षा मिटविण्याचे काम महेश दादांनी नेहमीच केले. यातून माणसे जोडत गेली. या प्रचंड जनसंपर्काच्या बळावर आणि केलेल्या विकास कामांची पावती म्हणून यावेळी तिसऱ्यांदा महेशदादा आमदार होतील असा विश्वास चिखली येथील जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितू यादव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
यादव म्हणाले की, सन २०१४ मध्ये आमदार महेशदादा लांडगे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. त्यांचे व्हिजन आणि लोकांना मदत करण्याची मानसिकता यावर आम्ही तरुण मंडळी आकर्षित झालो. त्यावेळी चिखलीत आम्ही अतिशय कमी कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी होतो. मात्र त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे सन २०१९ च्या निवडणुकीत अख्खे चिखली गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले.
आ. लांडगे यांनी जी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली. पाण्याचे त्यांनी योग्य ते नियोजन केले. या आधी शहरासाठी पवना नदीचे पाणी एवढा एकच स्त्रोत होता. आ. लांडगे यांनी भविष्यातील व्हीजन डोळ्यासमोर ठेवून भामा आसखेड मधून पाणी आणले. समाविष्ट गावांसाठी त्याचे वाटप ही सुरू झाले आहे. अनेक भागात पाण्याचे आश्वासन देऊन लोक दहा दहा वर्षे निवडून येतात. त्यानंतर पाणी आणले म्हणून दहा वर्ष पुढे आमदार राहतात. आमदार महेशदादा यांनी मात्र पाणी आणतो असे केवळ सांगितले नाही तर ते आणले आणि दिले सुद्धा. या शब्दात यादव यांनी लांडगे यांचे कौतुक केले.
तरुण पिढीला संत साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी आ. लांडगे यांच्या पुढाकारातून संतपीठ साकारले. शहर वाढते तसे अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. सोसायटी आणि बिल्डर यांच्यामध्ये अनेक विषयांवर वाद होतात. पार्किंग, पाणी असे अनेक विषय असतात. आ. लांडगे यांनी सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून समन्वय आणि त्यातून मार्ग काढण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विकास कामांसाठी स्थानिक लोकांकडून आवश्यक त्या जागा सहमतीने व समन्वयाने त्यांनी मिळविल्या. त्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागली. या भागात चिखली ते संतपिठ रोड, चिखली ते सोनवणे वस्ती, चिखली ते जाधव वाडी मार्गे पुणे नाशिक मार्गाला जोडणारा रस्ता अशी अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची समस्या ही बऱ्याच प्रमाणात कमी होईल असे यादव यांनी सांगितले.
आमदार महेशदादा लांडगे यांनी जनसेवेसाठी, लोकांची कामे करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी टीम तयार केली आहे. शाळा महाविद्यालय प्रवेश, आरोग्य अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करणारी टीम आहे. त्यांचे हे काम लक्षात घेऊन सामान्य माणसाला नगरसेवकापेक्षा त्यांचा आधार वाटतो. यातच त्यांचे मोठेपण आहे असे यादव यांनी सांगितले. केलेल्या विकास कामांच्या बळावर आमदार महेशदादा लांडगे हे तिसऱ्यांदा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









