वैचारिक,सांस्कृतिक कार्यक्रमांनी संविधान दिन साजरा

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध वैचारिक, सांस्कृतिक,प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. “ये मेरा संविधान, ये तेरा संविधान, हम सबका संविधान, भारत का संविधान” अशा संविधान गौरवाच्या ओळींनी निर्मिक आर्ट्स याग्रुपच्या तरुणांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. सुप्रसिद्ध गायक चेतन चोपडे यांनी संविधानातील मूल्यांना उजागर करणारी गीते सादर करत प्रेक्षकांना विवेकी होण्याचे आवाहन केले.
२६ नोव्हेंबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळच्या सत्रात गायक मारुती जकाते, बापू माने, अनिरुद्ध सूर्यवंशी, सुनील गायकवाड, निहाल लगाडे आणि गायिका सुमन चोपडे यांनी गीतगायनाच कार्यक्रम सादर केला. त्यानंतर संगीतकार मंगलसिंग सोळंके, गायक अरुण खरात, गायिका अस्मिता खरात, प्रिया पवार, साक्षी उपध्यक्ष्ये यांचा संविधानावर आधरित “स्वरधारा” हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. सुप्रसिद्ध गायक चेतन चोपडे यांनी संविधान आणि देशभक्तीपर गीतांचा “तुझ्या पाउलखुणा” हा कार्यक्रम सादर केला. त्यांनी संविधानातील मूल्यांना उजागर करणारी गीते सादर करत प्रेक्षकांना विवेकी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या गायकीला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तर “रंग अमन के” हा कार्यक्रम निर्मिक आर्ट्स मुंबई यांनी हिंदी मराठी सांस्कृतिक जलसा सादर केला. नागरिकांनी ज्ञानी होत प्रश्न विचारले पाहिजेत असा संदेश त्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला.
आज दि.२७ नोव्हेंबर रोजी सकाळी संविधानावर आधरित गीत गायनाचा कार्यक्रम गायक गौतम बद्रिके, राहुल विघ्णे,रोषण तेलतुंबडे, पंढरीनाथ गाडे,प्रभाकर भगत, गायिका संगीता भंडारे यांनी सादर केला. त्यानंतर सुप्रसिद्ध कव्वाल भारतबाबू लोणारे, विशाल ओव्हाळ, धीरज वानखेडे, स्वप्नील पवार, शेखर गायकवाड यांनी संविधानाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला. दुपारच्या सत्रात सुप्रसिद्ध गायक संकल्प गोळे आणि गायिका दीक्षा वाव्हळ यांनी आपल्या बहादर गायनातून संविधानाची महती गायली. प्रसिद्ध गझलकार अशोक गायकवाड यांनी आपल्या गझल गायनाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले. सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या सुमधुर, स्वराल आवाजातून संविधानाच्या मुल्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या शिंदेशाही आवाजाने रसिकांना गीतांच्या तालावर ठेका धरायला भाग पडले. तर गायिका गायत्री यांनी शेलार आपल्या मधुर आवाजात संविधानाचे महत्व सांगितले.













