मुदतीत काम सुरू झाले नाही तर लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकणार – आमदार सुनील शेळके

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोणावळा नगरपरिषदेत दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी आढावा बैठक पार पडली.
लोणावळा शहरातील मुख्य प्रलंबित कामांबाबत जिल्हाधिकारी साहेबांकडे बैठक लावण्यात आली होती. सदर बैठकीत सूचना करून देखील नगरपरिषद प्रशासन दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यात प्रामुख्याने भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाचे काम १० मार्च पर्यंत सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. जर मुदतीत काम सुरू झाले नाही तर लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकणार असल्याचे देखील सांगितले.
त्याचप्रमाणे खंडाळा येथील नगरपरिषद शाळेच्या विस्तारीकरणासाठी लगतच्या जागा मालकांना तत्काळ उर्वरित पैसे देऊन जागा ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या.
यामध्ये कोणतेही राजकारण अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांना सांगितले.
लोणावळा शहराचा पर्यटन दृष्ट्या विकास साधण्यासाठी वळवण तलावाच्या विकास आराखड्याची पाहणी करण्यात आली. त्यासाठी सुमारे ८ कोटी रुपये अंदाजित खर्च येणार असून ५० % खर्च नगरपरिषदेने करावा व ५० % खर्च जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मी उपलब्ध करून देणार आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू असून उर्वरित कामासाठी श्री. सूर्यकांतजी वाघमारे साहेबांनी मागणी केली, त्यानुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे २ कोटी ७८ लक्ष इतक्या निधीची उपलब्धता येत्या काही महिन्यात करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला, सदर काम अतिशय दर्जेदार पद्धतीने होत आहे.
परंतु शहरातील उर्वरित कामे देखील अशाच दर्जेदार पद्धतीने करण्याबाबत सूचना दिल्या.
शहराच्या सौंदर्याचे भान राखून गेल्या १० वर्षांपेक्षा जुन्या टपरी धारकांचे होकर्स झोन करून पुनर्वसन करे पर्यंत त्यांना हटविण्यात येऊ नये, परंतु नव्याने टाकलेल्या १० वर्षांच्या आतील टपऱ्यांचे अतिक्रमण १५ दिवसांत हटविण्याबाबतच्या सूचना दिल्या.
त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात लोणावळा शहरात केलेल्या जनसंवाद दौऱ्या दरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यामध्ये खंडाळा येथील तलावलगत अनेक वर्षांपासून राहणाऱ्या माझ्या स्थानिक बांधवांना घरकुल, रस्ते व मूलभूत सुविधा मिळणे,
महात्मा फुले भाजी मंडई विकसित करणे,
रामनगर येथील गायरान जागा घरकुल योजनेसाठी उपलब्ध करणे,शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,
अनुकंपा तत्वावरील वारसांना नोकरी मिळणे,
इंदिरानगर येथे पोलिस क्वार्टरजवळील अंतर्गत रस्ता करणे,
खंडाळा येथील जिम साहित्य बसविणे, नवीन अंगणवाड्या इमारती बांधणे, शहरातील स्वच्छता, अनधिकृत पाणी पुरवठा कनेक्शन या विषयांबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधींसह राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय., भाजपा, मनसे या पक्षांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









