मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना ज्यूस पाजला; तलवार उंचावत जल्लोष, शिवरायांचा जयघोष

मुंबई,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. त्यानंतर, सकाळी ९ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल झाले असून त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगेंना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलं. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मुख्यमंत्री व मनोज जरांगे यांनी वंदन केले. तर, दोघांनीही तलवार हाती घेऊन जल्लोष केला. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री मंलगप्रभात लोढा यांच्यासह अनेक नेत आणि सरकारचे अधिकारी वाशीत दाखल झाले आहेत. शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर मराठा समाजाकडून पुष्पवृष्टी झाली. तसेच, मराठा समाजाकडून घोषणाबाजीही करण्यात येत असून आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले होते.
मध्यरात्री सरकारचं शिष्टमंडळाने नवीन अध्यादेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचं सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितले. यानंतर मनोज जरांगेंनी सरकारच्या या निर्णयाबाबत मराठा आंदोलकांशी चर्चा केली. त्यांना सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर आपण आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. समाजाला विचारून मी हा निर्णय घेतला आहे. मी मराठा समाजाला मायबाप मानलं आहे, मी मुलगा म्हणून काम करतो, असं मनोज जरांगे म्हणाले.









