PCMC : आधी विरोध आता विजयाचा संकल्प!
पिंपरी चिंचवडमधील बहुचर्चित प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप प्रचाराचा नारळ आज फुटणार, राहुल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पॅनलचा प्रचार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २५ (वाकड, ताथवडे, पुनावळे) मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणात होत आहे. यावेळी प्रभागातील भाजप उमेदवार माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित असतील. पुनावळे गावठाणातून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर याच भागातून पदयात्राही काढण्यात येणार आहे.
निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये मोठे इन्कमिंग झाले. त्यात राहुल कलाटे यांचा प्रवेश सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याचे एक कारण होते स्थानिक इच्छुकांचा विरोध. पक्षाकडून कलाटे यांचा प्रवेशही झाला आणि त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. यानंतर मात्र स्थानिक नेत्यांनी तलवार म्यान करत कलाटे यांचे नेतृत्व मान्य करून, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सुरुवात केल्याचे बघायला मिळाले.
हा कार्यक्रम दिनांक ६ जानेवारी रोजी काळभैरवनाथ मंदिर, पुनावळे गावठाण येथून सायंकाळी ४.०० वाजता सुरू होईल. पदयात्रा पुनावळे गावठाण परिसरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार असून, पदयात्रेचा मार्ग काळ भैरवनाथ मंदिर, बोरगे वाडा, ओव्हाळ वस्ती, सावतामाळी मंदिर मार्गे पुनावळे हायवे चौक असा मार्ग असणार आहे. यावेळी प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्यासह कुणाल वाव्हळकर, श्रुती राम वाकडकर आणि रेश्मा चेतन भुजबळ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
प्रचार शुभारंभा संदर्भात बोलताना विचारले असता, भाजप उमेदवार राहुल कलाटे म्हणाले, “मी पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रभाग क्रमांक २५ चे नेतृत्व २०१७ पासून करतोय. विधानसभा निवडणुकीवेळी पण इथल्या मतदारांनी मला साथ दिली. माझ्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात पुनावळे कचरा डेपो प्रश्न मार्गी लावण्यासाठीच्या संघर्षापासून ते इथे काशिनाथ कृष्णाजी ढवळे (पाटील) ऑक्सिजन पार्क, पाण्याच्या टाक्या, ओपन जिम अशी कामे पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून अंतर्गत रस्ते विकासाची कामं प्रगतीपथावर आहेत. लोकांच्या हितासाठी संघर्ष मला नवीन नाही. मात्र केवळ संघर्ष नाही तर लोकांच्या प्रश्नांना ठोस आणि सक्षम पर्याय देण्याचा माझा निर्धार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागरिक-केंद्रित विकासाला अधिक गती देत प्रत्येक प्रश्नाचे वेळबद्ध आणि परिणामकारक उत्तर दिले जाईल.”
पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत. “विकास, विश्वास आणि विजयाचा संकल्प” या संदेशासह भाजपने प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासाचा अजेंडा घराघरात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.




















