राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!
शिक्षण विभागातर्फे शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्यात अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्यास भारतीय जैन संघटनेचे वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे उत्साहात प्रारंभ झाला. याचे उद्घाटन एमएससीईआरटीच्या समता विभागाचे उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, समता विभागाच्या प्रमुख वर्षाराणी भोपळे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, बीजेएस शाळा प्रबंधन समितीचे अध्यक्ष विलास राठोड, एसएमएफचे कार्यकारी संचालक व्ही. वेंकटरमना यांच्या प्रमुख उपस्थित झाले. या प्रसंगी पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातून आलेले शिक्षक, एमएससीईआरटी अधिकारी तथा एसएमएफचे मूल्यवर्धन तज्ज्ञ, मास्टर ट्रेनर्स आदी उपस्थित होते.
‘मूल्यवर्धन हा एक कार्यक्रम नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारी एक चळवळ आहे. हा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. शिक्षणमंत्री, प्रधान सचिव तसेच सर्वच अधिकार्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात काम करण्याची संधी मिळाली, हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. प्रत्येकाने स्वतःचा कार्यक्रम म्हणून या प्रशिक्षणात झोकून देऊन सहभाग व्हावे आणि राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यासाठी अथक परिश्रम करावेत, असे आवाहन डॉ. इब्राहिम नदाफ यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना केले.’
शांतिलाल मुथ्था म्हणाले, ‘२००९ ते २०२० या काळात राज्य शासनाच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन १.० व २.० राबविल्यानंतर या वर्षीपासून पुढील पाच वर्षे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक कृतीआराखडा यांच्याशी सुसंगत असे ‘मूल्यवर्धन ३.०’ राज्यातील १ लाख शाळांमधून, ५ लाख शिक्षकांच्या मदतीने, १ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे. मूल्यवर्धन हा इव्हेंट नाही, तर मुव्हमेंट आहे. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद आहे. सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले, तर भविष्यात नक्कीच शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन झालेले असेल.’
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षाराणी भोपळे यांनी केले. तर उद्घाटन सत्रानंतर तीन बॅचमध्ये १२२ शिक्षकांच्या प्रशिक्षणास प्रारंभ झाला. दि. १६ जून ते १८ जुलै दरम्यान राज्यातील निवडक शिक्षकांचे प्रशिक्षण पाच टप्प्यात होणार आहे.
निवडक शिक्षकांचा राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम
दिनांक – शिक्षक संख्या- जिल्हे
१६ ते २० जून – १२२ – बुलढाणा, नागपूर, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, अकोला
२३ ते २७ जून – १६६ – छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशीव, नांदेड
३० जून ते ४ जुलै- १६९ – कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक
७ ते ११ जुलै – २२० – बीड, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पालघर
१४ ते १८ जुलै – १७० – मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सोलापूर










