ताज्या घडामोडीपिंपरी

निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प रद्द करण्यासाठी भूमिका घ्या! सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे यांचे खासदार आणि आमदारांना साकडे

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रशासकीय काळात अनेक अनावश्यक व भविष्यात शहरातील लोकांना त्रासदायक ठरतील असे प्रकल्प राबविण्याचा व लोकांचा विरोध डावलून ते रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २४, २५, २६, २७ आणि २८ या भागात महापालिका हरित सेतू प्रकल्प राबवणार आहे. पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. मात्र हा प्रकल्प भविष्यात त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे लोककल्याण लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण योग्य ती भूमिका घ्यावी, अशी विनंती पिंपरी – चिंचवड भाजपचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे
यांना पत्र देऊन केली आहे.

महापालिकेच्या वतीने निगडी प्राधिकरणात हरित सेतू प्रकल्प राबविण्यात येणार असून या प्रकल्पास बाळा शिंदे यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना पत्र देऊन हा प्रकल्प रद्द करण्याची विनंती केली आहे; तसेच प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच प्रकरणाचा पाठपुरावा करत आता बाळा शिंदे यांनी हरित सेतू प्रकल्प रद्द करण्यासाठी भूमिका घ्यावी, असे साकडे खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांना घातले आहे.

हरित सेतू प्रकल्पाद्वारे प्राधिकरणातील प्रशस्त व सुव्यवस्थित असलेले रस्ते छोटे करून पदपथ मोठे करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे भविष्यात वाहतूककोंडी होऊन हवेचे प्रदूषण वाढणार आहे. या प्रकल्पांतर्गत सायकल ट्रॅकची केलेली घोषणाही फसवी आहे; कारण याआधी पिंपळे सौदागर भागात पिंपरी – चिंचवड महापालिकेने सुरू केलेला सायकल शेअरिंग प्रकल्प गुंडाळण्याची वेळ आली आहे. हरित सेतू प्रकल्पाच्या नावाखाली झालेले चुकीचे काम दुरुस्त करण्यासाठी भविष्यात पदपथ आणि सायकल ट्रॅक काढून टाकण्याची वेळ येणार हे निश्चित आहे. यात महापालिकेच्या आणि पर्यायाने करदात्या नागरिकांच्या पैशांची लूट होणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेता हरित सेतू प्रकल्प रद्द करावा अशी प्राधिकरणातील समस्त नागरिकांची मागणी आहे. आपण एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहात. जनतेच्या प्रश्नांची आपल्याला जाण आहे. राष्ट्रहित आणि लोककल्याण लक्षात घेऊन हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण योग्य ती भूमिका घेऊन प्रशासनास याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी या पत्रात केली आहे. आता हे लोकप्रतिनिधी बाळा शिंदे यांच्या पत्रानंतर काय भूमिका घेतात याकडे समस्त प्राधिकरणवासीयांचे लक्ष लागले आहे. प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प रद्द झाल्यास पुणे – मुंबई महामार्गावर महापालिकेने मुख्य रस्ते छोटे करून पदपथ मोठे करण्याचा आरंभलेला उद्योगसुद्धा गुंडाळावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button