पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील बीसी सेल विभागाच्या वतीने आज ‘ अल्पसंख्यांक हक्क दिवस ’ साजरा करण्यात आला. या निमित्त्ताने महाविद्यालयात प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. सुषमा मोकाशे-गावडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रो.डॉ.संगीता अहिवळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीसी सेल च्या चेअरमन प्रा. स्वप्ना हजारे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी अल्पसंख्यांक हक्क दिवस या दिवसाचे महत्व सांगत हा दिवस साजरा करण्यामागील भूमिका विशद केली.
या कार्यक्रमासाठी विशेष व्याख्याते म्हणून आलेल्या अॅड. सुषमा मोकाशे-गावडे यांनी आपल्या व्याख्यानात ‘ अल्पसंख्यांक हक्क दिवस ’ याबद्दल बोलताना सांगितले की, १८ डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात अल्पसंख्यांक दिन म्हणून साजरा करण्यात येत असला तरी १९९२ मध्ये अधिकृत कागदावर आलेली संकल्पना आहे. ही संकल्पना विविधतेतून एकता यामधून जन्माला आलेली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १ आणि २ मध्ये अल्पसंख्यांक समाजाविषयीच्या सर्व संकल्पना, तरतुदी यांबाबत सविस्तर विवेचन दिलेले आहे.आपण सर्वांनी ते काळजीपूर्वक वाचून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण आपल्या देशात शिक्षण, नोकरी, मेडिकल, सरकारी सवलती या सर्वांमध्ये अल्पसंख्यांक वर्गासाठी राखीव जागा आहेत परंतु यांचा लाभ या क्षेत्रातील फार कमी व्यक्ती घेतात कारण त्यांना याबद्दल फारच कमी ज्ञान असते.
प्रो.डॉ.संगीता अहिवळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून देशाच्या प्रगतीसाठी त्या देशातील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. प्रत्येक समाजाच्या व्यक्तीचा डीएनए मध्ये वेगळेपण असते. आणि त्याच्या या वेगळेपणामुळेच देशाची प्रगती आणि विकास होत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील पारशी या अल्पसंख्यांक समाजातील टाटा आणि पूनावाला या घराण्यांचा उल्लेख करता येईल.असे मत प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे आभार डॉ.सचिन चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.सपना उगले यांनी केले. या कार्यक्रमासाठी कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो.डॉ.कामयानी सुर्वे, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ.नीलकंठ डहाळे, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. मारुती केकाणे उपस्थित होते.
