जागतिक परिषदेत चिंचवड चरखा संघाला संधी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हैदराबाद येथे दि. २५ आणि २६ एप्रिल पार पडलेल्या पहिल्या भारत शिखर परिषदेस चिंचवड चरखा संघाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये १०० देशातून ४५० प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित होते. यामध्ये चिंचवड चरखा संघाचे मयूर जयस्वाल यांना तेलंगणा मुख्यमंत्री रेवता रेड्डी यांच्या वतीने विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
दोन दिवस चाललेल्या परिषदेमध्ये जागतिक स्तरावरील न्याय या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये जगातील अनेक देशांचे मंत्री, खासदार, सामाजिक संस्थेत काम करणारे अनेक दिग्गज पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. युवक व राजकारण, लैंगिक समानता न्याय, हवामान बदल, पर्यावरण, आर्थिक असमानता, अशा विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
देशाचे विरोधी पक्ष नेते श्री राहुल गांधी यांनी या परिषदेस संबोधन केले. तेलंगणाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार आमदार, भारतातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे तज्ञ या ठिकाणी उपस्थित होते.
चिंचवड चरखा संघाच्या वतीने या परिषदेत महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान व त्यांनी केलेले कार्याची माहिती विविध देशातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. महात्मा गांधी व स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक असलेला चरख्याचे प्रशिक्षण यावेळी सर्व प्रतिनिधींना देण्यात आले. चरख्याची सुरुवात त्यातून निर्माण झालेला स्वातंत्र्य संग्रामाचा लढा, स्वदेशीचा नारा, स्वयंरोजगार अशा अनेक प्रकारची माहिती विदेशी प्रतिनिधींनी जाणून घेतल्या. सूतकताईचा अनुभव त्यांच्यासाठी मुख्य आकर्षण ठरले.
चिंचवड चरखा संघाच्या वतीने ही संधी मिळाल्याबद्दल मयूर जयस्वाल यांनी मुख्यमंत्री रेवंता रेड्डी व तसेच आयोजकांचे आभार मानले.









