कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी, शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर जोरदार मोर्चा

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यभरातील फुलउत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले. फ्लॉवर ग्रोवर
कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात पारंपरिक फुलउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
बाजारपेठेत कृत्रिम फुलांना मिळणाऱ्या वाढत्या मागणीमुळे नैसर्गिक फुलउत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी त्यांचे उत्पादन खर्च वाढले असून विक्री घटली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत शासनाकडे कृत्रिम फुलांवरील नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
या आंदोलनाला आमदार, मंत्री आणि शेतकरी नेत्यांचा मोठा पाठिंबा लाभला. या वेळी मंत्री भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन करत कृत्रिम फुलांच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या परिणामांची गंभीर दखल घेतली. त्यांनी शासन पातळीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या मोर्चात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या संघर्षाला ठाम पाठिंबा दर्शवला. त्यांनी पारंपरिक शेती व नैसर्गिक फुलउत्पादनाचे जतन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी ते शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या मोर्चात आमदार बाबाजी काळे, आमदार महेश शिंदे, आमदार शंकर मांडेकर यांच्यासह विविध भागांतील शेतकरी नेते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चादरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले आणि शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आपला आक्रोश मांडला.
शेतकऱ्यांचा हा लढा केवळ नैसर्गिक फुलांच्या उत्पादनासाठी नव्हे, तर शेती टिकण्यासाठीही महत्त्वाचा आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














