
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवडने स्कायलाईन डिझाईन सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने आयोजित केलेले हास्य कवीसंमेलन उत्साहपूर्ण आणि हास्यमय वातावरणात संपन्न झाले.
यावेळी हास्यकवी बंडा जोशी,महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष प्रा. राजन लाखे, उद्योजक संदीप चांदणे व अमित निकम, लायन वसंत गुजर, डॉ सुधीर काटे, सुवर्णा जाधव आणि डॉ. रजनी शेठ तसेच जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ, सोपान खुडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. राजन लाखे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. साहित्य, कविता आणि हास्य यांचा सुंदर संगम घडवून आणण्यामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून रसिकांना आनंदाचे क्षण देण्यासाठी अशा हास्यकवी संमेलनांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे हास्यकवी बंडा जोशी यांनी आपल्या बहारदार हास्यकवितांनी रसिकांना मनमुराद हसवले. त्यांच्या विनोदी कविता, मिश्कील निरीक्षणे आणि दैनंदिन जीवनातील प्रसंगांवरील भाष्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कवी नितीन कुलकर्णी, डॉ. तरुजा भोसले, बाळकृष्ण अमृतकर , विदुला व्यवहारे , तेजश्री पाटील, बबन धुमाळ, प्रतिमा कलंत्रे, प्राची देशपांडे, अनघा पाठक, शिला टाकळकर, मीना शिंदे, रामचंद्र पाचुणकर, बी. आर. माडगूळकर , कमल सोनजे, अभिजित कोळपे, आशा नष्टे , जयवंत पवार, श्रुती कुळकर्णी, भगवंत वालोकर आणि इतर असे ३२ कवी सहभागी झाले होते.
कार्यक्रमात संदीप चांदणे, अमित निकम यांच्यासह लायन वसंत गुजर, डॉ. सुधीर काटे , कवयित्री सुवर्णा जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली.
हास्यकवितांच्या माध्यमातून सामाजिक जीवनातील विविध पैलू, माणसांचे स्वभाव, दैनंदिन अनुभव आणि विसंगती यांचे मिश्कील चित्रण कवींनी खुमासदार शैलीत मांडले.
संजय जगताप यांनी बहारदार सूत्रसंचालन केले आणि आभारही मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब गोरे किशोर पाटील, किरण लाखे, किरण जोशी, अशोक होनराव, जयश्री श्रीखंडे आनंद यंकरस, यांनी विशेष परिश्रम घेतले.
















