
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशात आणि राज्यात होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यावश्य असणाऱ्या परीक्षांच्या पेपर फूटीच्या प्रकरणाबाबत आज पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ने पत्रकार परिषदा आयोजित केली.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार विशेष उपस्थित होते.
यावेळी बोलताना हनुमंत पवार म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने युवक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा क्रूर खेळ बंद करावा. देश पातळीवरील NEET ची पेपरफुटी, महाराष्ट्रातील TET, राजस्थानमधील पॅरामेडिक परीक्षेची पेपरफुटी, पुणे मनपातील नोकर भरती पेपर फुटी अशा असंख्य परीक्षांचे पेपर या सरकारच्या काळात चक्क पैसे घेवून विकले जात आहेत. कोणावरही जबाबदारी निश्चित होत नाही, कोणत्याही मंत्री, अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. सरकार आणि प्रशासनातील अधिकारी या प्रकरणात थेट गुंतलेले असून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. लाखो विद्यार्थ्याच्या जीवन मरणाच्या या विषयावर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष, NSUI आणि युवक काँग्रेस महाराष्ट्रासह देशभर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन निदर्शने करत आहेत.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे राजीनामे घेवून NEET आणि TET परीक्षेच्या पेपर फुटीची न्यायालयीन चौकशी करून दोषींना तात्काळ गजाआड करण्याची काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी आहे.
विधानसभेच्या मागील अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा केल्याचे भाषण दिले होते, तुम्ही केलेला कायदा सक्षम होता तर हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर TET चा पेपर फुटला कसा? कायदा कुचकामी आहे, की प्रशासनातील अधिकारी भ्रष्ट आहेत की मंत्रालयातील मंत्री पेपर फुटीत सहभागी आहेत? याची उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी.
२०२१ ला TET पेपर फुटी झाली होती, शिक्षण खात्यातील, परीक्षा परिषदेतील अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी अटक करण्यात आली होती, या केसच पुढे काय झाल? यावर ही आता मुख्यमंत्री बोलत नाहीत.
या भाजपच्या लोकांनी पेपर फोडले, आमदार, खासदार फोडले, मंदिराची दानपेटी फोडली. यांना जनता यांची जागा नक्की दाखवेल.
असे हनुमंत पवार म्हणाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “पेपर फुटतो, विश्वास तुटतो” असा विश्वासघात सातत्याने होत आहे सर्व स्तरातून अपयशी झालेलं हे सरकार आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व्यापार करण्यावर उठले आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिका सुद्धा विकण्याचं काम यांच्या सरकारच्या काळात होत आहे, ही बाब अतिशय गंभीर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण करणारी आहे अनेक विद्यार्थ्यांनी या विषयी आत्महत्या केल्या आहेत, याबाबत तात्काळ केंद्र आणि राज्यातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी ठाम मागणी आमची आहे. विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक वर्षाची नुकसान भरपाई कशी होणार? याचे उत्तर या सरकारने द्यावे, या भ्रष्टाचाराच्या दृष्टचक्रात होरपळलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, कुटुंबीय या भाजप सरकारला कधीही माफ करणार नाहीत, यांना भविष्यात सत्तेच्या परीक्षेत सपशेल फेल केल्याशिवाय हे पीडित आता राहणार नाहीत आम्ही सर्वतोपरी त्यांच्या न्यायासाठी लढा देऊ. असे बनसोडे म्हणाले.
या प्रसंगी काँग्रेसचे परदेश प्रवक्ते हनुमंत पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, माजी सचिव गौतम आरकडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल बनसोडे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम, कबीर मोहम्मद, राहुल शिंपले, सुरज कुलकर्णी, विल्यम साळवी, सदाशिव तळेकर, हिराचंद जाधव, लक्ष्मण म्हेत्रे आदी उपस्थित होते.



