पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९२.०९ टक्के लागला. गतवर्षी ही टक्केवारी ९४.१० हाेती. विशेष म्हणजे यंदा बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीचा निकालही सरासरी २ टक्क्यांनी घसरला आहे. राज्य मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के; तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.४१ टक्के लागला आहे.
यंदा राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले. यात सर्वाधिक १०४ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. गतवर्षी हा आकडा २११ इतका हाेता. नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ टक्के असून, मुलांची टक्केवारी ८९.५६ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का ५.४० ने जास्त आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यापैकी १४ लाख २० हजार ४७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
सोलापूरच्या निकिताला सर्व विषयांत ३५ गुण
सोलापूर : दहावी परीक्षेेत ज. रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने सर्वच विषयांत प्रत्येकी ३५ गुण मिळवत एक वेगळीच नोंद केली आहे. तिच्या या अनोख्या निकालाची परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चा होत असून मित्र परिवार व शिक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे. अशा निकालांना ‘परफेक्ट ३५’ किंवा ‘काठावर पास’ म्हणून संबोधले जाते.

