औद्योगिक सुरक्षा सप्ताहात कामगारांनी घेतली शपथ
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे. यात ४ मार्च ते १० मार्च दरम्यान औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. मात्र कारखान्यातील अपघात पाहता कामगारांना सुरक्षिततेच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेता त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आज कामगारांनी एकत्रित मिळून सुरक्षित काम करण्याची शपथ घेतली.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित थरमॅक्स चौक चिंचवड येथे औद्योगिक सुरक्षा कामगार सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, लाला राठोड,सुनील भोसले,दिलीप डिकोळे, रोहन मुरगुंड,सामशुद्दीन शेख, विकास कुमार, किसन कदम, रंजना पाटील, शुभम कोरे,अनिल भोसले, वंदना राणे आदि सह कामगार उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की, सन१९७२ पासून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदाचे ५५ वे वर्ष आहे. पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी, चाकण, भोसरी, तळेगाव, रांजणगाव यासह पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण परिसरात मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. लाखोच्या संख्येने कामगार येथे काम करतात कंत्राटी, असंघटित कामगारांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांचे जीवन अनमोल आहे. कामगारांचे शरीर व अवयव यास इजा न होण्याची काळजी घेण्याची गरज आहे. केवळ सुरक्षा सप्ताहाचे कंपन्यांच्या समोर फलक लावून उपयोग होणार नाही तर कामगारांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे ते जनजागृती कमी असल्यानेच अपघात नेहमीच घडत आहेत.
यावेळी कामगारांना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. “सुरक्षित काम सुरक्षित जीवन” हा संदेश देत सर्वांनी सुरक्षित कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची शपथ घेतली.
अग्निशमन प्रात्यक्षिके, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण, कामगारांनी सुरक्षा साधनांचा म्हणजे सेफ्टी बेल्ट सेफ्टी शूज, हेल्मेट, ग्लोज, मास्क वापरावे. अग्निशमन यंत्रणा तयार ठेवावी कामाच्या ठिकाणी अडथळे नसावेत व स्वच्छ ठिकाण असावे, धोकादायक रसायनापासून आंतर असावे, सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, नादुरुस्त यंत्रावर काम करणे टाळावे, यंत्रामधील बिघाड असल्यास वरिष्ठांना कळवून तेथे कामास नकार द्यावा.
या कार्यक्रमामुळे कामगारांमध्ये सुरक्षा जागरूकता वाढीस मदत होणार असून अपघातमुक्त कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा निर्धार सर्वांकडून व्यक्त करण्यात आला.

