शेवटच्या माणसाला आरक्षण भेटेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही – मनोज जरांगे यांची रोखठोक भूमिका

लोणावळा, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजाचे खूप प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ही एकजूट कायम ठेवा शेवटच्या माणसाला आरक्षण भेटेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी रोखठोक भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाने चर्चेसाठी कोणाला पाठवण्याऐवजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा करायला यावे. मुंबईला जाण्यापूर्वी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत असे सांगितले.
जरांगे पाटील यांच्या वाकसई चाळ येथील सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. नजर जाईल तिथपर्यंत मराठाच मराठा समाज दिसत होता. तीन वाजता सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाकसई चाळ येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा व मुक्काम बुधवारी रात्री 8.30 वाजता होणार होता मात्र पुणे व पिंपरी चिंचवड भागात त्यांना समर्थन देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज जागोजागी जमल्याने ते वाकसई चाळ येथे तब्बल 10 तास उशिराने पोहचले.
मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे मुंबईत कोणतीही गडबड गोंधळ होणार नाही याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो असे जरांगे पाटील म्हणाले. ज्या 54 लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना व त्यांचे सगेसोयरे, गणगोत सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ओबीसी मधूनच समाजाला आरक्षण द्यावे या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून शासनाने त्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन म्हणून जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाला केले आहे.
लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला फिरायला नाही तर लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून आरक्षण मागायला चालला आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात व मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळा येथील सभेतून शासनाकडे केली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघाला आहे. आज वाशी येथे मुक्काम करत उद्यापासून मराठा समाज वाशी ते मुंबई असा पायी प्रवास करत आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी जाणार आहे. दरम्यान आज लोणावळ्यातून वाशी कडे जाताना पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना द्रुतगती मार्गावरून जाऊ न देता जुन्या मार्गाने जाण्याची विनंती केली. जरांगे पाटील म्हणाले, कोठूनही घेऊन जा, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. जरांगे पाटील यांना आमरण उपोषणासाठी आझाद मैदान व शिवाजी मैदान नाकारले आहे. मात्र मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यावर ठाम आहेत. शासनाच्या दोन शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेत चर्चा केली मात्र ही चर्चा निष्पक ठरल्याने जरांगे पाटील दुपारी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईकरांची व मराठा समाज आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा साठी समोर यावे व आरक्षणाच्या आमच्या मागण्या मान्य करत तोडगा काढावा अशी मागणी म्हणून जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान ही रॅली ऐवढी मोठी होती वाकसई ते लोणावळा हे चार किमी अंतर जाण्यासाठी त्यांना साडेचार तास लागले. रात्री साडेसात वाजता मनोज जरांगे पाटील लोणावळा शहरातून पुढे गेले. मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.









