आदिवासी बहुल बेलगाव येथील वाचनालयाला १०० पुस्तके भेट
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे नवोदित तसेच प्रस्थापित कवींना दर महिन्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या आणि विविध काव्यप्रकारांचा अभ्यास करण्याच्या हेतूने ‘मासिक काव्यधारा’ या अभिनव उपक्रमाचा नुकताच शानदार शुभारंभ करण्यात आला. या उद्घाटनपर कार्यक्रमात एकूण ४८ कवींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या कविता सादर केल्या.
या स्तुत्य उपक्रमाचा शुभारंभ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व कवी संजय खानोलकर, उद्योजक सुरेश गोयल, ‘मसाप’ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे आणि उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले,
”शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील कवींना हक्काचे व्यासपीठ देणारा आणि त्यांची काव्यप्रतिभा जागृत ठेवणारा ‘मासिक काव्यधारा’ हा मसापचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. अशा प्रकारे साहित्यिक कार्यक्रमांचे सातत्य ठेवणारी ही एकमेव शाखा महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड ला असून राजन लाखे यांच्या सफल नेतृत्वाखाली कार्य करते आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
प्रमुख पाहुणे संजय खानोलकर व सुरेश गोयल यांनीही आपले मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले व सहभागी कवींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आदिवासी भागातील वाचनालयाला १०० पुस्तके भेट
केवळ साहित्यिक चळवळच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत मसाप पिंपरी-चिंचवड शाखेकडून
कार्यक्रमाचे औचित्य साधून वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील बेलगाव या आदिवासीबहुल गावातील वाचनालयासाठी मसाप तर्फे १०० पुस्तके भेट देण्यात आली. गावातील भावी वाचनालयाचे प्रवर्तक विलास वानखडे यांनी ही पुस्तके स्वीकारून मसाप पिंपरी चिंचवड बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मसाप’चे अध्यक्ष राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये त्यांनी ‘मासिक काव्यधारा’ या उपक्रमाची गरज, त्यामागील भूमिका आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर भाष्य केले.
या उपक्रमाचे प्रतिनिधी म्हणून मीना शिंदे व किरण जोशी यांनी चोख जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर पाटील, किरण लाखे, जयश्री श्रीखंडे, श्रीकांत जोशी आणि राजू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन संजय जगताप यांनी केले.
कवींच्या उदंड प्रतिसादात हा शुभारंभ सोहळा संपन्न झाला.

