Spread the love

 

– दापोडीतील सभेत महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार

दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देश संविधानावर चालतो. त्याच संविधानाने पंतप्रधानांना खुर्चीवर बसवले आहे. परंतु, भाजपला याचा विसर पडलेला आहे. संविधान वाचविण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मशाल चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करा, अशी विनंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी केली.

दापोडी येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, माजी नगरसेवक रामचंद्र माने, संजय दुर्गुळे, सुशीला पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) इंजी. देवेंद्र तायडे, काँग्रेसचे भाऊसाहेब मुगुटमल, युवा सेनेचे संतोष म्हात्रे, तुषार नवले, विभाग प्रमुख नितीन घोलप,अमोल निकम, माधव मुळे, गुलाबराव गरुड, दिनकर केदारी, जन्नत सय्यद, सुप्रिया काटे, शाखा प्रमुख मंदार तांबे, विनोद जाधव, तुषार खडसने, उपशहर संघटिका सुषमा शेलार, विभाग प्रमुख राजू सोलापुरे,महेबुब शेख, तनाभाऊ काटे, रवी कांबळे, नंदू गुजर, कैलास बनसोडे यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अॅड. भोसले पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणा-या भाजपने त्यांचे स्मारक अद्याप उभे केले नाही. भारताचे संविधान “नॉलेज ऑफ सिम्बॉल” म्हणून ओळखले जाते. मात्र, त्यालाच धक्का पोहोचविण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. त्यांचे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा करतात. त्यामुळे ही वृत्ती आपल्याला नष्ट करायची आहे. मतदान करताना महागाई, बेरोजगारी, मेटाकुटीला आलेला शेतकरी, सिलेंडर दरवाढ, कामगारांचे प्रश्न विचारात घ्या. जनतेच्या आश्वासनाची पूर्तता झाली का, याचा विचार करा. देशात एकही घटक समाधानी नाही. देशात हुकूमशाही प्रवृत्तीला थांबविण्याचे व त्यांना घरी बसविण्यासाठी या निवडणुकीत सर्वांनी मतदान करा. उद्धव ठाकरे यांचे शिलेदार संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हासामोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे म्हणाले की, ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपल्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची निवडणूक आहे. येणाऱ्या पिढ्यांना स्वतंत्र आणि मुक्त श्वास घेता यावा त्यांच्या मूलभूत गरजा आणि अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगता यावं. यासाठी ही देशाची निवडणूक आहे. त्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. मणिपूरमधील महिलांवर, महिला खेळाडूंवर झालेला अन्याय, वाढलेली बेरोजगारी विसरु नका. त्यांच्या खोट्या गॅरंटीला जनतेने आता बळी पडू नये. मावळमध्ये इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आहेत. त्यांनाच मतदान करून विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, “जय भवानी, जय शिवाजी”, संजोग वाघेरे पाटील आगे बडो, हम तुमारे साथ है, अश्या घोषणा देत परिसर दणाणून गेला होता.

Share.
Leave A Reply

Exit mobile version