ताज्या घडामोडीपिंपरी

गुरू गोविंदसिंह यांच्यामुळे सनातन धर्म अस्तित्वात राहिला! -विजयजीत सिंह वालिया

Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘गुरू गोविंदसिंह यांच्यामुळे सनातन हिंदुधर्म अस्तित्वात राहिला!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सदस्य विशेष संपर्क विभाग विजयजीत सिंह वालिया यांनी विश्व हिंदू परिषद सभागृह, पुणे येथे मंगळवार,( दिनांक २० जानेवारी २०२६)  व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे वतीने शीख बंधू समागम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून वालिया बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र धर्मप्रसार प्रमुख अजय निलदावार, लष्कर गुरुद्वारा प्रमुख चरणजीतसिंह सहानी, गुरुमुखसिंह गुरुनानी, हिंदू आध्यात्मिक सेवा संघ कोषाध्यक्ष गुरुबितसिंग मखिया, मनजितसिंह सेठी, नरेंद्र सिंह बक्षी, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

विजयजीत सिंह वालिया पुढे म्हणाले की, ‘देशात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील प्रत्येक लढ्यात शीख समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गुरू तेग बहादूरसिंह साहिब जी यांनी धर्मासाठी बलिदान दिले. ज्या औरंगजेबाने त्यांचा शिरच्छेद केला त्याची कबर आज उपेक्षित अवस्थेत आहे; तर तेगबहादूरसिंह यांच्या समाधीपाशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्या ठिकाणी भाविकांसाठी चोवीस तास लंगर (भोजनसेवा) चालविले जाते. सद्यःस्थितीत शीख समाजाने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्रित येऊन सुरक्षित भविष्यासाठी योजना आखली पाहिजे!’ असे आवाहन त्यांनी केले.

अजय निलदावार यांनी प्रास्ताविकात विश्व हिंदू परिषदेची स्थापना, उद्देश व भूमिका विशद केली. किशोर चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. मुकुंद सिंग, विलास फाटक, संजय हसिंजा,शैलेंद्र जाधव, मनोज शेलार, हृषीकेश सपाटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button