नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू – उद्योग मंत्री उदय सामंत

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यातील महत्त्वाच्या नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी सरकारने तीन टप्प्यांत प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड, पुणे आणि परिसरातील पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे संपूर्णपणे शुद्धीकरण करण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानपरिषद सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनीही उपप्रश्न विचारला.
याबाबत अधिक माहिती देताना उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, इंद्रायणी आणि पवना नदी प्रकल्पाचा (PMRDA मार्फत) एकूण खर्च ६७१ कोटी असून यास ६० टक्के केंद्र शासन, ४० टक्के पीएमआरडीए निधी वाटप करण्यात येणार आहे. पवना नदी प्रकल्पाचा (PMRDA मार्फत) खर्च २१८ कोटी असून याबाबतचा निधी ६० टक्के केंद्र, ४० टक्के स्थानिक तर सीईटीपी प्रकल्पाचा खर्च (MIDC मार्फत) १२०० ते १५०० कोटी असून एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक सांडपाण्याची शुद्धता तपासणे हा याचा उद्देश आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी ‘जायका’ कडून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्ताव दाखल केला गेला आहे. यावर “इंद्रायणी-पवना नद्यांचे उगमपासून संगमापर्यंत संपूर्ण शुद्धीकरण करण्यात येणार आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले असल्याचेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या तीनही विभागांची बैठक होईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.












