राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21च्या पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- वर्षानुवर्षे खुर्च्या उबवूनही पिंपरी गावासाठी काहीच न केलेल्या मंडळींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 चे उमेदवार संदीप वाघेरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. यावेळी संदीप वाघेरे बोलत होते. कार्यक्रमास डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, सुनिता वाघेरे, मीना (मीनाताई) नाणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच वर्षांत पिंपरी गावात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. “पिंपरी गावाचा आणखी वेगाने विकास करायचा असेल आणि रखडलेली कामे पूर्ण करायची असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनलला विजयी करणे आवश्यक आहे. आम्हाला फक्त तुमचे पंधरा दिवस द्या, पुढील पाच वर्षे आम्ही तुमच्यासाठी देऊ,” अशी भावनिक साद त्यांनी मतदारांना घातली. काही लोकांनी वर्षानुवर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवल्या, मात्र गावासाठी काहीही केले नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पिंपरी गावाला स्वच्छ, सुंदर आणि पिंपरी-चिंचवड शहरातील आदर्श ग्राम बनवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेविका सुनिता वाघेरे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवडचा विकास केला आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय तसेच शंभर फुटी रस्ता ही विकासकामे त्यांच्या नेतृत्वामुळेच पूर्ण झाली. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गिरीजा कुदळे यांनी सांगितले की, संदीप वाघेरे यांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन काम केले असून पिंपरी गावच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. महापालिकेत भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मीना नाणेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला आहे. संदीप वाघेरे यांनी पिंपरी गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून मंदिरांचा जीर्णोद्धार आणि विविध विकासकामे केली आहेत. कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
वर्षानुवर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवूनही ज्यांनी पिंपरी गावासाठी काहीच केले नाही, अशा लोकांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही विकासाची कामे केली असून, पुढील पाच वर्षांत पिंपरी गावाला स्वच्छ, सुंदर आणि आदर्श ग्राम बनवण्याचा आमचा संकल्प आहे. आम्हाला फक्त पंधरा दिवस द्या, पुढील पाच वर्षे आम्ही तुमच्यासाठी देऊ.
– संदीप वाघेरे, उमेदवार, राष्ट्रवादी, प्रभाग- 21, पिंपरी गाव.




















