पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्त

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आज आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना कार्यालय प्रमुख सुधीर जोशी, तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काल या शहीद कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक शिवसेना यंत्रणेला जबाबदारी सोपवली होती.
संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या कायदेविषयक डिप्लोमा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून, ती सध्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट (HRD) या क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. यासोबतच ती लेबर लॉ विषयाचेही शिक्षण पूर्ण करत आहे. तिच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करताना डॉ. गोऱ्हे यांनी तिचे अभिनंदन केले.
कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार, आसावरीला पुण्यातच शासकीय सेवेत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले असून, संबंधित विभागांशी समन्वय साधून अर्ज उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (गृहमंत्री), पुणे महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
तसेच, गणबोटे कुटुंबीयांचा ‘गणबोटे फरसाण हाऊस’ हा पारंपरिक व्यवसाय अधिक विस्तारावा यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा संपूर्ण आढावा घेण्यात आला असून, पुढील वाटचालीसाठी ठोस योजना लवकरच अमलात आणल्या जाणार आहेत.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी एक भावनिक क्षणही उपस्थितांशी शेअर केला. त्यांनी सांगितले की, “आज आसावरीचा निकाल लागला, ही तिच्या आयुष्यातील महत्त्वाची घडी आहे. पण तिचे वडील तिच्यासोबत नसणे, हे दुःख शब्दांत मांडता येणार नाही. देशासाठी दिलेले हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही.”
दहशतवाद्यांच्या या कृत्याचा तीव्र निषेध करत दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.शहीदांच्या कुटुंबांसोबत शासन आणि समाज खंबीरपणे उभा आहे, हे या संपूर्ण भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.









