लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भाजपतर्फे आदरांजली

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपने त्यांना विनम्र अभिवादन केले. आज, १ ऑगस्ट रोजी मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दोन्ही महान विभूतींच्या कार्याला आदराने स्मरण करण्यात आले.
शहर भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी टिळक आणि साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना काटे म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी गर्जना करून स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांचे राष्ट्रप्रेम आणि दूरदृष्टी आजही आपल्याला प्रेरणा देते.”
पुढे ते म्हणाले, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने आणि शाहिरीने समाजातील उपेक्षित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या लेखणीतून उमटलेला सामाजिक चळवळीचा आवाज आजही महत्त्वाचा आहे.” या दोन्ही महान नेत्यांनी आपापल्या क्षेत्रातून जनतेला जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असून, आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, विठ्ठल भोईर, सुरेश भोईर, उत्तम केंदळे, उपाध्यक्ष कैलास सानप, बबन डांगले, भारती चव्हाण, अरुण चाबुकस्वार, राजाभाऊ मासुळकर, गणेश वाळुंजकर, जयेश चौधरी, संतोष सिंग, प्रविण कुंजीर, बाळकृष्ण परघळे, सीमाताई चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.














