‘आयडिया’ला जोड द्या व्यवसायिकतेची – सागर बाबर
पेटंटमुळे व्यावसायिक उत्पादनास चालना - मुकुल कुमार

पीसीसीओईमध्ये ‘क्षितिज – २०२५’ शोकेस प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक काळात विद्यार्थी अनेक प्रकल्प सादर करतात. सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून तयार केलेल्या प्रकल्पांना व्यावसायिकतेची जोड दिली तर आर्थिक विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने ‘क्षितिज २०२५’ या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. क्षितिजमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी समाविष्ट असलेल्या काही मोजक्या प्रकल्पांमधील काही प्रकल्प पेटंट मिळवून व्यावसायिक स्वरूपात रूपांतरित केले जातील, असे प्रतिपादन कॉमसेन्स टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य एआय अधिकारी सागर बाबर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मध्ये शनिवारी ‘क्षितिज – २०२५’ शोकेसचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सागर बाबर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पबमॅटिक इंजिनिअरिंगचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष मुकुल कुमार, टाटा मोटर्सचे सरव्यवस्थापक बीएसके रेड्डी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विकास व संशोधन अधिष्ठाता डॉ. नरेंद्र देवरे संयोजक दीप्ती खुर्गे, सह-संयोजक डॉ. केतन देसले विविध विद्याशाखांचे प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. क्षितिज २५ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, कॉम्प्युटर इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आदी विभागातील पेटंट मिळण्यायोग्य २८ प्रकल्प सादर करण्यात आले.
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ज्ञानसंपदा आहे. विद्यार्थ्यांनी जनसामान्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करून सामाजिक उन्नतीच्या दृष्टीने प्रकल्प सादर केले पाहिजेत आणि त्याची नोंदणी करणे म्हणजेच पेटंट घेणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यावसायिक उत्पादन करण्यास मदत मिळते, असे मुकुल कुमार म्हणाले.
पीसीसीओईने विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मुक्त व्यासपीठ क्षितिज च्या रूपाने दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वैचारिक सामाजिक जाणीवांना नवा आयाम मिळतो हे कौतुकास्पद आहे याचे अनुकरण सर्वांनी केले पाहिजे. पीसीसीओई सातत्याने नवनवीन प्रकल्प सादर करून जबाबदार नागरिक घडवण्याचे काम करीत आहे हे सामाजिक विकासासाठी उपयुक्त आहे असे रेड्डी म्हणाले.
क्षितिज प्रदर्शनास औद्योगिक क्षेत्रातील दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. शाश्वत विकास उद्दिष्टे आणि वास्तविक – जागतिक प्रभाव याची माहिती मिळावी तसेच नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी पीसीसीओईहे प्रदर्शन आयोजित करते. क्षितिज शोकेसचे हे चौथे वर्ष आहे. व्हिएलएसआय आणि एम्बेडेड सिस्टम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आणि मेकॅनिकल डिझाइन या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. प्रकल्पांमधील कल्पकता आणि तांत्रिक कौशल्ये विकसित करून विद्यार्थ्यांनी उद्योग जगतातील उपस्थित प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले. सादर केलेल्या सर्जनशील आणि व्यावहारिक उपयोगी प्रकल्पांचे कौतुक करून अनेक प्रतिनिधींनी पुढील सहकार्य करण्यास किंवा निवडलेल्या प्रकल्पांच्या निरंतरता आणि व्यवसायिकतेसाठी गुंतवणूक करण्यास उत्सुकता व्यक्त केली.
स्वागत, प्रास्ताविक डॉ. गोविंद कुलकर्णी, सूत्रसंचालन डॉ. दिप्ती खुर्गे आणि आभार डॉ. केतन देसले यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.









