जनता दरबार उपक्रमाला वाढता प्रतिसाद; आमदार सुनील शेळके यांचा जनतेशी थेट संवाद
आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- आमदार सुनील शेळके

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जनता दरबारात उपस्थित
वडगाव मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी करत, त्यांचा जनता दरबार उपक्रम पुन्हा एकदा नागरिकांच्या भरघोस उपस्थितीमुळे यशस्वी ठरला.
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात आमदार शेळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे सविस्तर ऐकून घेतले. मागील साडेपाच वर्षांप्रमाणे दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रलंबित शासकीय कामे, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी, योजनांचा लाभ, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा यासंबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी मांडल्या.
दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, पंढरीनाथ ढोरे, नारायण ठाकर, नारायण भालेराव, भरत येवले, सुहास गरुड, चंद्रकांत दाभाडे आणि किशोर सातकर हे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेत कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला.
यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले, “आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत. त्या ऐकून घेऊन तत्काळ निर्णय घेणे आणि प्रशासनाला कामासाठी भाग पाडणे, हीच खरी जबाबदारी आहे. जनता दरबार उपक्रमातून लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते, त्यातूनच परिवर्तनाची दिशा ठरते.”
वडगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्यामुळे जनता दरबाराला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीमुळे मावळ तालुक्यात लोकांमध्ये विश्वास व समाधान व्यक्त होत आहे.












