ताज्या घडामोडीपिंपरी

वृक्षमित्र अरुण पवार यांच्यावतीने वृक्षदान चळवळी अंतर्गत विविध संस्थांना वृक्ष रोपांचे वाटप

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने वृक्षमित्र अरुण पवार यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विविध संस्थांना एक हजार वृक्ष रोपांचे वाटप करीत पर्यावरण वाचविण्यासाठी ‘वृक्षदान चळवळी’चा संकल्प केला. पुढील आठवडाभर वृक्षप्रेमींना पाच फूट उंचीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

‘झाडे लावून व पाणी वाचवून पर्यावरणाचा योग्य समतोल राखूया’ या उपक्रमांतर्गत देशी रोपे पिंपळ, वड, कडुलिंब, चिंच, आवळा, आबा, जांभूळ, पेरू, करंज अशा चार ते पाच फूट उंचीच्या रोपांचे विविध संस्थांना वाटप करण्यात आले. औंध जिल्हा रुग्णालय येथे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षरोपण करण्यात आले. टाटा मोटर्स टाटा ऑटोकॉम्प हेंड्रिक्सन प्लांट, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज अँड ज्युनिअर कॉलेज आकुर्डी, सामाजिक कार्यकरते संदीप काकरे यांना वृक्ष लागवडीसाठी वृक्ष रोपे दान देण्यात आली. तसेच पंडितगुरू पार्डीकर महाविद्यालय, शिरसाळा (ता.परळी वैद्यनाथ जि. बीड) येथील महाविद्यालयाला गतवर्षीप्रमाणे यंदाही ५०० वृक्ष रोपे लागवडीसाठी दान देण्यात आली. या सर्व संस्थांनी वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प करीत वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वृक्ष चळवळीत सहभाग घेतला.

याबाबत बोलताना अरुण पवार यांनी सांगितले, की निसर्गातूनच माणसाचा जन्म झाला आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्याचे जीवन जगणे सोपे झाले. वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान आहे. धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली जतन केले पाहिजे. माणसाने निसर्गाला विद्रूप करायचा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळे एकेकाळी वैभवशाली असलेल्या निसर्गाला अवकळा येत चालली आहे. आज प्रमाणाबाहेर जंगलतोड होत आहे. प्रदूषण, अवर्षण, जमीनीची धूप या संकटांना आपणच आमंत्रण देत आहोत. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून जपले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button