काळेवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महिला मेळावा उत्साहात
पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चाच्यावतीने तृतीयपंथी डॉ. आम्रपाली मोहिते यांच्या कार्याचा गौरव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुरुवारी, आरंभ लॉन्स, काळेवाडी येथे भव्य महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. भाजपा पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) महिला मोर्चा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिक, विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या मेळाव्यात सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक आणि कीर्तनकार प्रा. दिगंबर ढोकळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या लोककल्याणकारी प्रशासनावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांचे ओजस्वी विचार ऐकून उपस्थित भारावून गेले.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुजाताताई पालांडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, कार्यक्रमाचे संयोजक विजय ऊर्फ शितल शिंदे, सहसंयोजक राजू दुर्गे, राजेंद्र राजापूरे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
या मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे “तृतीयपंथीयांच्या परिसरातील काम करणाऱ्या तृतीयपंथीयांचा विशेष सत्कार” करण्यात आला. या सत्काराने कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. यावेळी तृतीयपंथी सप्तरंगी आई डॉ. आम्रपाली मोहिते यांच्या अतुलनीय सामाजिक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. डॉ. मोहिते यांनी समाजाच्या दुर्बळ घटकांसाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
डॉ. आम्रपाली मोहिते या एक तृतीयपंथी सप्तरंगी आई म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी समाजाच्या दुर्बळ व वंचित घटकांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. पुण्यात सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या मुलांसाठी त्या सहा ठिकाणी फूटपाथ शाळा चालवतात, तसेच आतापर्यंत १३७ हून अधिक मुलांची फी भरून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. बेघर गरजू मुलांसाठी दररोज ५० लिटर दुधाचे वाटप, ससून रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नछत्र, रस्त्यावरील बेघर लोकांना वैद्यकीय उपचार मिळवून देणे आणि १५९ हून अधिक गरजू लोकांना व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. याशिवाय, तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या महिलांच्या आरोग्य, शिक्षण, आर्थिक व सामाजिक विकासासाठी त्या झटतात. दिव्यांग बांधवांना कुबड्या, व्हीलचेअर, कृत्रिम अवयव व रोजगार मिळवून देणे, निराधार ज्येष्ठांची काळजी घेणे, व्यसनमुक्ती, महिला व युवा सक्षमीकरण, एचआयव्ही बाधित रुग्णांना सहाय्य आणि मासिकपाळीविषयी जनजागृती करून मोफत सॅनिटरी पॅड वाटप करणे असे विविध समाजोपयोगी उपक्रम त्या राबवतात.
सत्काराने भारावून गेलेल्या डॉ. आम्रपाली मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या सन्मानामुळे त्यांना पुढील कार्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे. समाजाकडून मिळणारा हा आदर त्यांना अधिक जोमाने काम करण्यास प्रोत्साहन देईल, असे त्यांनी नमूद केले.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी जे कार्य केले, ते समाजाला नवी दिशा देणारे आहे. अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्या विचारांचा प्रसार होतो आणि महिलांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळते.”
आमदार महेशदादा लांडगे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या दूरदृष्टीने समाजकार्य केले, ते खरोखरच अद्वितीय आहे. त्यांच्या लोककल्याणकारी प्रशासनातून आजही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आजच्या काळात महिलांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे यावे, यासाठी असे मेळावे महत्त्वाचे आहेत.”
आमदार उमाताई खापरे म्हणाल्या, “अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आज अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. डॉ. आम्रपाली मोहिते यांच्यासारख्या समाजसेविकांचे कार्य हे अहिल्यादेवींच्याच कार्याची साक्ष देते.”
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले, “अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ एका साम्राज्याचे नेतृत्व केले नाही, तर समाज परिवर्तनाचे एक मोठे कार्य केले. महिलांच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत. या मेळाव्यातून त्यांच्या कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “अहिल्यादेवी होळकर या एक महान प्रशासक आणि समाजसुधारक होत्या. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून विकास साधला. आजच्या महिलांनी त्यांच्या या विचारांना पुढे घेऊन जाण्याची गरज आहे आणि अशा कार्यक्रमातून ती प्रेरणा मिळते.”
भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई पालांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात महिलांवरील अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त करत म्हटले, “महिलांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. महिलांना समाजात सुरक्षित आणि सन्मानाने जगता यावे, यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन महिलांनी निर्भयपणे आपले हक्क मिळवावेत.” असे सांगून त्यांनी उपस्थित महिलांना शपथ दिली.
उपस्थितांनी आपल्या भाषणातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सामाजिक समानतेसाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व विशद केले. तसेच, अहिल्यादेवींच्या दूरदृष्टीचे आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. राष्ट्रशाहिर सुरेशराव सुर्यवंशी यांच्या “रणगाथा शौर्याचा” या पोवाडयाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी, माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, नीता पाडाळे, आरती चोंधे, निर्मला कुटे, ज्योती भारती, उषा मुंढे, अश्विनी चिंचवडे, जयश्री गावडे, कमल घोलप, शर्मिला बाबर, मनिषा पवार, कुंदाताई भिसे, भारतीताई विनोदे, गिरीजा शिंदे, पल्लवी पाठक, पल्लवी मारकड, प्रतिभा जवळकर, सीमा चव्हाण, स्वाती देशमुख, सीमा बोरसे, कविता हिंगे, वैशाली वाखारे, जयश्री मकवाना, निता भालेराव, संजना मराठे, विद्या अभंग, वैशाली खाडये, रोहिणी रासकर, सुप्रिया चांदगुडे, शोभा थोरात यांच्यासह मोठया संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजाता पालांडे यांनी केले. आभार पल्लवी मारकड यांनी मानले.









