जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला,२८ ठार

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. पहलगाममध्ये आज(22 एप्रिल 2025) पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत 27 पर्यटकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर त्यांचे नाव आणि धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. दहशतवादी संघटना TRF ने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
या घटनेनंतर भारतीय लष्करासह केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लष्कराने परिसराला वेढा घातला असून, दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच, हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा तात्काळ श्रीनगरला रवाना झाले. तत्पुर्वी त्यांनी आयबी आणि रॉ प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनीदेखील गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, कठोर कारवाईचे निर्देश दिले.









