पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचा पक्षपाती पणा : अतिक्रमण कारवाईमध्ये सामाजिक संस्थांना त्रास ; राजकीय व्यक्तींच्या फ्लेक्सबाजीला मात्र अभय

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या अलीकडील अतिक्रमण कारवाईवर गंभीर पक्षपाताचे आरोप होत आहेत. सामाजिक संस्था, ज्यांचा उद्देश लोकहिताचा असून, विविध जनकल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या या संस्थांना महानगरपालिकेच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, राजकीय नेत्यांच्या फ्लेक्स आणि बॅनरबाजीकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे.
सामाजिक संस्थांना त्रास, राजकीय बॅनरवर डोळेझाक
पिंपळे सौदागर परिसरात अतिक्रमण विरोधी पथक नियमितपणे कारवाई करत असते. या कारवाया करताना सामाजिक संस्था लावलेल्या छोट्या सूचना फलकांवर तात्काळ कारवाई केली जाते, त्यांना नोटीसा पाठवल्या जातात, फलक काढून टाकले जातात किंवा दंड आकारला जातो. परंतु त्याच भागात राजकीय पक्षांचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर झळकत असूनही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे प्रकार अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीतील दुजाभाव दाखवतात.
सामाजिक संस्था म्हणतात : “सर्वांसाठी एकच नियम हवा”
या प्रकारामुळे सामाजिक संस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. “आम्ही समाजहितासाठी काम करत असताना जर आमच्यावरच अन्याय केला जात असेल, तर पुढे समाजसेवा करणे कठीण होईल,” असे मत एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. सामाजिक संस्था या व्यापारी किंवा राजकीय उद्देश न ठेवता कार्यरत असूनही त्यांच्यावरच कठोर नियम लावणे हा अन्याय आहे, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांचाही रोष
सामान्य नागरिकही या पक्षपाती कारवाईबाबत नाराज आहेत. “राजकीय बॅनर रस्त्याच्या कडेला, झाडांवर, सार्वजनिक ठिकाणी लावून शहराची शान घालवत आहेत. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मग नियम फक्त सामाजिक संस्थांसाठीच का?” असा सवाल अनेक सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाकडून खुलासा अपेक्षित
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या तक्रारींचे गांभीर्याने संज्ञान घेणे गरजेचे आहे. आकाशचिन्ह विभागाने आपली कारवाई निपक्षपाती ठेवून सर्व प्रकारच्या अनधिकृत फलकांवर एकसमान कारवाई केली पाहिजे. अन्यथा नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होऊ शकते. संपूर्ण शहराच्या सौंदर्यरक्षणासाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अतिक्रमण विभागाने सर्व घटकांवर एकसमान नियम लागू करणे गरजेचे आहे अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.









