संपत्ती इच्छापत्र करणे काळाची गरज – ॲड.सतिश गोरडे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या धकाधकीच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत आहे मात्र नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण लक्षवेधी झाले आहे. भाऊ-बहीण, वडील-मुलगा अशा विवध नात्यांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण होऊन न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे हे वाद टाळून आपले व आपल्या वारसदारांचे जीवन सुखकर करावयाचे असल्यास ‘संपत्ती इच्छापत्र’ करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे यांनी केले.
महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी या ठिकाणी प्राध्यापक प्रबोधिनी, आय.क्यू. ए. सी. व दर्द से हमदर्द तक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राध्यापक प्रबोधिनी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
‘संपत्ती इच्छापत्र’ या विषयावर महाराष्ट्रभर ॲड सतिश गोरडे हे विविध ठिकाणी व्याख्याने देऊन समाजप्रबोधन करीत आहेत. सामाजिक स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी या प्रबोधनाने मोठी मदत होणार असल्याचा मनोदय मा. बाळासाहेब वाघेरे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते. आजच्या धावपळीच्या युगात मानवी जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत. महापूर, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीतही मानवी जीवनाला धोका प्राप्त होत आहे, त्यामुळे इच्छापत्र सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सुहास निंबाळकर, कला शाखेच्या उपप्राचार्य प्रो. डॉ.कामायनी सुर्वे, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य प्रो. डॉ. संगीता अहिवळे, सुपरवायजर प्रा. रुपाली जाधव, ॲड. सुहास पडवळ, ॲड.राजेश पुणेकर, ॲड. आशिष गोरडे, प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन प्रा. भाऊसाहेब सांगळे, आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार ग्रंथपाल डॉ. तृप्ती अंब्रे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. वैशाली खेडकर यांनी केले.













