सांगवीत केवळ सोयी नव्हे, स्वावलंबन हवे! रोजगार-उद्योजकतेसाठी डॉ. प्रज्ञा शक्ती गायकवाड यांची विकासाची शिट्टी

सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- सांगवी प्रभागात यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. प्रज्ञा शक्ती गुप्त गायकवाड यांनी विकासाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत आर्थिक स्वावलंबन, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता यांना केंद्रस्थानी ठेवलेला ठाम राजकीय अजेंडा मांडला आहे. शिट्टी हे आपले निवडणूक चिन्ह घेऊन त्यांनी मतदारांना थेट आणि भावनिक आवाहन करत “फक्त रस्ते, लाईट आणि पाणी म्हणजे विकास नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
प्रचारादरम्यान डॉ. गायकवाड म्हणाल्या की, सांगवीचा खरा विकास तेव्हाच साध्य होईल जेव्हा प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. “घरातील मुलांना दर्जेदार शिक्षण, महिलांना घरबसल्या रोजगार, तरुणांना उद्योगाच्या संधी आणि चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, तरच शहराची आर्थिक चक्रे फिरतील,” असे त्या ठामपणे मांडतात.
विशेष म्हणजे, त्यांच्या प्रचारात महिला सक्षमीकरणाला अग्रक्रम देण्यात आला आहे. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मदत, लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि स्थानिक उद्योजक घडवण्याचा आराखडा त्यांनी मतदारांसमोर ठेवला. तरुणांसाठी स्टार्टअप संस्कृती, उद्योग-संलग्न प्रशिक्षण आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती हे त्यांच्या विकास मॉडेलचे मुख्य आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धम्मरत्न गायकवाड हे बरेच तरुणांना रोजगार देण्याचे काम करत आहे न पुढे ही करणर आहे सांगवी तील काही महिलांना व्यवसाय सुरु करून दिला आहे.
“जेव्हा सांगवीतील प्रत्येक नागरिक स्वावलंबी होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास होईल,” असे सांगत त्यांनी मतदारांना बदल घडवण्याचे आवाहन केले. राजकारणात नव्या विचारांचा सूर घुमवण्यासाठी आणि जनतेचे सरकार आणण्यासाठी शिट्टी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रचारात “शिट्टी वाजवा – विकासाचा नवा सूर सुरू करा!” हा घोषवाक्य नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत असून, अपक्ष उमेदवार म्हणून डॉ. प्रज्ञा शक्ती गुप्त गायकवाड यांनी आर्थिक सक्षमतेचा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणत राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत.




















