ताज्या घडामोडीपिंपरी

भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य – शत्रुघ्न काटे

पंतप्रधान मोदी सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' ते 'विकसित भारत' अशा यशस्वी ११ वर्षांच्या कार्यकाळाचा मांडला आढावा

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारने पारदर्शकता, प्रामाणिकता, गतीशीलता आणि निर्णयक्षमतेसह कार्य केले आहे. पूर्वीच्या भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन विकासाला प्राधान्य देण्यात आले. ‘शासन म्हणजे सेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवले गेले. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीमुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने मध्यस्थांचा वाटा पूर्णपणे संपला आहे. वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीमुळे करप्रणालीत सुसूत्रता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. याच काळात कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा भारताशी असलेला संबंध अधिक दृढ करण्यात आला, जो ऐतिहासिक निर्णय ठरला, असे गौरवोद्वार भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ११ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर भाजपने मोरवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी या परिषदेत सरकारच्या ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण’ या त्रिसूत्रीवर आधारित विविध योजना, महत्त्वपूर्ण निर्णय आणि प्रभावी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ‘आत्मनिर्भर भारत’ ते ‘विकसित भारत’ अशा दूरदृष्टीच्या संकल्पाकडून भारताने सिद्धीकडे यशस्वी वाटचाल केली असून, या ११ वर्षांतील अभूतपूर्व कार्यक्षमतेवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, चंद्रकांत नखाते, संतोष कलाटे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, भाजपा भटके-विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, सोशल मीडिया प्रभारी संजीवनी पांडेय, अमेय देशपांडे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने भरीव योगदान दिले आहे. रेल्वेसाठी तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. मागील यूपीए सरकारने १० वर्षांत दिलेल्या एकूण निधीपेक्षा अधिक निधी मोदी सरकारने केवळ एका वर्षात महाराष्ट्राला दिला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात राज्यात ६ लाख कोटी रुपयांची कामे वेगाने सुरू आहेत. ‘प्रत्येकाला घर’ देण्याच्या संकल्पाकडे वाटचाल करत या सरकारने ३० लाख घरे देण्याचा विक्रम केला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प, जे गेली ४० वर्षांपासून रखडले होते, ते मोदी सरकारच्या काळात मार्गी लागले आणि आता पूर्णत्वाकडे जात आहेत.

गरीब कल्याण हे मोदी सरकारच्या धोरणांचे केंद्रबिंदू राहिले आहे. ८१ कोटी लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप करून अन्नसुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत १५ कोटी लोकांना नळ जोडणी मिळाली आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळून लाखो गरिबांना आरोग्य कवच मिळाले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून करोडो महिलांना स्वयंपाकासाठी मोफत गॅस कनेक्शन मिळाले. ५५ कोटी जनधन खाती उघडली जाऊन बँकिंग सेवांचा सर्वसामान्यांपर्यंत विस्तार झाला. प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन, किसान सन्मान निधी यांसारख्या योजनांमुळे गरीब, ग्रामीण आणि शेतकरी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले आहे. मुद्रा योजनेमुळे ५२ कोटींपेक्षा जास्त लोकांना स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळाले. समाजातील वंचित घटकांना थेट लाभ देऊन २५ कोटींपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात यश आले आहे. उडान योजनेच्या माध्यमातून दीड कोटी भारतीयांनी विमान प्रवास केला असून, ७४ विमानतळांवरून १६० विमानतळांपर्यंत वाढ झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या १३६ असून, लवकरच ती ४०० पर्यंत पोहोचेल.

शेतकऱ्यांसाठी देशाचे बजेट १ लाख ३७ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, ३ लाख ७ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्पांमध्ये जवळपास २५ हजार कोटी रुपये गुंतवून सिंचनाच्या सोयी वाढवण्यात आल्या आहेत. किमान आधारभूत किंमतीत (MSP) सातत्याने वाढ करण्यात आली आहे. मध निर्यात ११ वर्षांत तिप्पट झाली असून, सौर पंपांची संख्या १० लाखांपर्यंत वाढली आहे. सहकार मंत्रालयाची स्थापना करून साखर कारखानदारीला ५० वर्षांत न झालेली प्रचंड मदत देण्यात आली (एनसीडीसी मार्फत ५५ हजार कोटी).
महिला आणि युवकांसाठी विविध योजना राबवून त्यांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ३३% आमदार-खासदार आरक्षणाचे धोरण आणले. नियंत्रण रेषेवर (LOC) पहिल्यांदा महिलांची तुकडी तैनात करण्याचे काम करण्यात आले. ७३% घरे महिलांच्या नावावर आहेत. ३ कोटी ‘लखपती दीदी’ तयार झाल्या असून, महाराष्ट्राने १ कोटी ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ९० लाख महिलांचे बचत गट तयार करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. माता मृत्यू दरात लक्षणीय घट होऊन तो ८० पर्यंत खाली आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले, ज्यामुळे शिक्षण वैश्विक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ८ नवीन आयआयएम आणि ४९० नव्या विद्यापीठांची स्थापना झाली आहे. १८-२८ वयोगटातील ३ कोटी मुलांचे ईपीएफओ खाते उघडण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय नोकरदार आणि मध्यमवर्गीयांसाठी दिलासादायक ठरला आहे.

‘राष्ट्र प्रथम’ या भूमिकेतून सरकारने काम केले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त करून भारताच्या शौर्याची प्रचिती जगाला दिली. संरक्षण स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देऊन आयात करत असलेली ५ हजार उपकरणे आता १००% भारतात बनतात आणि भारत ती निर्यात करतो. २४ हजार कोटी रुपयांपर्यंत संरक्षण सामग्रीची खरेदी ‘मेड इन इंडिया’ मधून केली आहे. चांद्रयान ३ च्या यशाने जपानला जे जमले नाही ते भारताने करून दाखवले. नक्षलविरोधी मोहीम वेगाने राबवून नक्षलवादाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने सरकार वेगाने वाटचाल करत आहे. आर्थिक प्रगतीत भारताने मोठी झेप घेतली आहे. २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगात १० व्या क्रमांकावर होती, आज चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली असून, पुढच्या तीन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर येण्याची अपेक्षा आहे. परकीय गुंतवणुकीत २६% वाढ झाली आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे भारत आत्मनिर्भर झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची दखल घेतली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमुळे आणि सामाजिक-राजकीय संबंधांमुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठा मान-सन्मान मिळत आहे.

या काळात संस्कृती आणि अस्मिता जपण्याचे कार्यही चांगल्याप्रकारे झाले आहे. राम मंदिर निर्मिती आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉर यांसारख्या उपक्रमांतून सांस्कृतिक पुनरुत्थानाला चालना मिळाली आहे. या सर्व कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशाचे श्रेय १४० कोटी भारतीयांना दिले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राने भारताने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊले टाकली आहेत, असे शत्रुघ्न काटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button